नुकताच झालेल्या विधान परिषद निवडणुकीत राष्ट्रवादी शरद पवार गट पुरस्कृत उमेदवार जयंत पाटील यांचा पराभव झाला. तर महायुतीचे सर्व उमेदवार निवडून आले. त्यामुळेच महाविकास आघाडी मधल्या काँग्रेस पक्षाच्या सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केल्याचे उघड झाले आहे. या सातही आमदारांचा क्लोजर रिपोर्ट दिल्लीतील हाय कमांड कडे पाठवणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी सांगितले होते. त्याचबरोबर आमदार कोण आहेत याचा अंदाज आम्हाला होता, त्यानुसार आम्ही ट्रॅप लावला होता. हे गद्दार आमदार आमच्या ट्रॅप मध्ये अडकले आहेत. अशा विश्वास घातकी गद्दार लोकांना काँग्रेस मधून बाहेर काढले जाईल, असा इशारा नाना पटोले यांनी दिला होता. मात्र हे सात आमदार नेमके कोण याची चर्चा गेल्या दोन दिवसांपासून राजकीय वर्तुळात रंगताना दिसून येत आहेत. आणि आता अखेर हे सात आमदार कोण असतील याची शक्यता समोर आली आहे.
फुटलेल्या आमदारांपैकी विदर्भातील 1, मराठवाडातील 3, उत्तर महाराष्ट्रातील 2 आमदार तर एक मुंबईतील 1 आमदार असल्याची सूत्रांची माहिती आहे. या सर्व आमदारांवर संपूर्ण महाविकास आघाडीतील नेत्यांकडून आग पाखड केली जात आहेत. येत्या विधानसभा निवडणुकीत त्यांना उमेदवारी न देण्याची शिफारसही करण्यात येण्याची शक्यता आहे. त्याचबरोबर हे आमदार नेमके कोण आहेत, त्यांची नावे सध्या समोर आली आहेत.
हिरामण खोसकर, शिरीष चौधरी, झिशान सिद्दीकी, सुलभा खोडके, जितेश अंतापूरकर आणि मोहन हंबिर्डे हे सात आमदार फुटल्याची शक्यता वर्तवली जात आहे. नाना पटोले यांच्या म्हणण्यानुसार, ट्रॅप मध्ये अडकलेले सात आमदार हेच असल्याची सूत्रांची माहिती आहे. जर खरंच याच सात आमदारांनी क्रॉस वोटिंग केले असेल, आणि तसे जर पक्षांतर्गत चाचणीत समोर आले, तर मात्र त्यांच्यावर कोणती कारवाई होते, हे पाहणे महत्त्वाचे आहे.