लोकसभा निवडणुकांमध्ये महायुतीला बिनशर्त पाठिंबा देणारे महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी विधानसभा निवडणूक स्वबळावर लढवण्याची भूमिका जाहीर केली आहे. त्यानुसार त्यांनी आतापर्यंत एकूण सात उमेदवार जाहीर केले आहेत. तर उरलेल्या जागांसाठी त्यांचे एक एक उमेदवारी हि आता फिक्स होताना दिसत आहेत.
राज्यात आचारसंहिता लागू झाली असून अवघ्या महिनाभरावर निवडणुका आल्या आहेत. त्यामुळे महायुती, महाविकास आघाडी आणि तिसऱ्या आघाडीकडूनही उमेदवार निश्चित करणं सुरू आहे. त्यातच आता मनसे कडूनही अगदी महत्त्वाच्या समजल्या जाणाऱ्या ठाणे जिल्ह्यातील इच्छुकांची नावं समोर आली आहेत. आणि याच नावांवर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता देखील आहे. त्यातच विशेष म्हणजे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या विरोधात देखील मनसेचा तगडा उमेदवार असणार आहे.
अशा असतील लढती
1. एकनाथ शिंदे vs अभिजित पानसे
2. संजय केळकर vs अविनाश जाधव
3. प्रताप सरनाईक vs संदीप पाचंगे
4. जितेंद्र आव्हाड vs सुशांत सूर्यराव
ठाणे शहर, ओवळा माजिवडा, कळवा मुंब्रा, कोपरी-पांचपाखाडी या विधानसभा मतदारसंघांसाठी मनसेने तयारी सुरू केली असून अभिजीत पानसे, अविनाश जाधव, संदीप पाचंगे, सुशांत सूर्यराव अशी इच्छुक उमेदवारांची नावं आहेत. याबाबत अद्याप अधिकृत निर्णय जाहीर करण्यात आलेला नाही, त्यामुळे राज ठाकरे आपल्या या चार शिलेदारांना विधानसभेच्या आखाड्यात उतरवणार का याकडे सर्वांचे लक्ष लागलं आहे.