जालना : आज मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange) यांनी पुन्हा एकदा मराठा आरक्षणाच्या मुद्द्यावर अंतरवाली सराटीमध्ये बैठक बोलावली आहे. या बैठकीसाठी राज्यभरातून मराठा समाज अंतरवाली सराटीमध्ये दाखल झाला आहे. आगामी लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर या बैठकीला विशेष महत्त्व प्राप्त झालं आहे. या बैठकीपूर्वी मनोज जरांगे पाटील यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला.यावेळी त्यांनी पुन्हा एकदा सरकारवर हल्लाबोल केला आहे.
काय म्हणाले मनोज जरांगे?
‘अपेक्षित नसलेल्या गोष्टी झाल्या की समाज एकवटतो, मराठ्यांनी पुन्हा एकदा दाखवून दिलं आहे की आम्ही टिकणाऱ्या आरक्षणाच्या बाजूनं आहोत. मी माझ्या समाजाच्या हिताचं बोलत आहे. माझ्या समाजाचे लेकरं मोठे व्हावेत म्हणून मला समाजासाठी काम करायचं आहे. या बैठकीला आणखीही मराठे येणार आहेत. समाजाला विचारून समाजाच्या हिताचा निर्णय घेणार आहे. आचारसंहितेच्या अगोदर का नाही आरक्षणाबाबत निर्णय घेतला?’ असा सवाल जरांगे पाटील यांनी यावेळी केला.
जरांगेनी दिला इशारा
‘मी माझ्या भूमिकेवर ठाम आहे, कोणत्याही बदनामीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. मरेपर्यंत मी समाजाच्या बाजूनं उभं राहणार. गुन्हे मागे घेण्याची प्रक्रिया खूप दिवसांपासून सुरू आहे. आता बैठका घेतल्या तरी गुन्हे दाखल होऊ लागले आहेत. आणखी दहा पंधरा गुन्हे दाखल करणार आणि मला ते राज्यातून तडीपार करणार आहेत. तरीही मी समाजाशी नातं तुटू देणार नाही. मी माझ्या भूमिकेवर ठाम राहणार आहे. अजूनही वेळ गेलेली नाही,’ असा इशाराच मनोज जरांगे यांनी सरकारला दिला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
Lok Sabha Election : काँग्रेसकडून लोकसभेसाठी उमेदवारांची चौथी यादी जाहीर