जालना : मराठा समाजाला आरक्षण मिळावं या मागणीसाठी मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी आमरण उपोषण सुरु केलं आहे. उपोषणाचा चौथा दिवस असून मनोज जरांगे पाटील यांची प्रकृती खालावली आहे. तरीही त्यांनी उपचार घेण्यास स्पष्ट नकार दिला आहे. जरांगे पाटील यांना बोलताना त्रास होत आहे. मनोज जरांगे यांनी महाराष्ट्रातील मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देण्याच्या मागणीसाठी दुसऱ्यांदा आमरण उपोषण सुरू केले आहे.
मराठा आरक्षणासाठी जरांगे पाटील यांनी सुरू केलेल्या आमरण उपोषणाला राज्यातील अनेक भागात पाठिंबा मिळत आहे. राजकीय नेत्यांना गावबंदी करण्यात येत आहे. जालना जिल्ह्यात 307 गावात नेत्यांना गावबंदी करण्यात आली असून 107 गावात साखळी उपोषण सुरू करून जरांगे पाटलांच्या आंदोलनाला पाठींबा देण्यात आलाय.