अहमदननगर : राज्याचे महसूलमंत्री आणि अहमदननगर जिल्ह्यातील प्रवरा साखर कारखान्याचे प्रमुख राधाकृष्ण विखे पाटील (Radhakrishna Vikhe Patil) यांच्या संस्थेत झाकीर नाईक कडून पैसे आल्याचा गंभीर आरोप प्रवरा शेतकरी मंडळाच्या अध्यक्षांनी केल्यानंतर ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी राधाकृष्ण विखे पाटलांवर जोरदार निशाणा साधला होता. त्यांच्या या टीकेला आता राधाकृष्ण विखे पाटील यांनी प्रत्युत्तर दिलं आहे. संजय राऊत हा सर्वात मोठा दलाल आहे त्याने आयुष्यभर दलालीच केली आहे, असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले राधाकृष्ण विखे पाटील?
“पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नऊ वर्षांत घेतलेल्या महत्त्वाच्या निर्णयांमुळेच देशातील सामान्य माणसाचे पाठबळ हे केंद्र सरकारच्या पाठीशी आहे. परंतु ज्यांच्या पक्षाला आमदार सोडून गेले, त्या पक्षाची आता विश्वासार्हता राहिलेली नाही. त्यामुळे त्यांच्या वृत्तपत्रातून येणाऱ्या मतांना कोणताही अर्थ उरला नाही,” असे राधाकृष्ण विखे पाटील यांनी म्हटलं आहे.
संजय राऊत काय म्हणाले होते?
“विखे पाटलांवर अनेक आरोप आहेत. विखे पाटलांचे अनेक उद्योग आहेत. या संदर्भात आपण या आधीच बोललो आहे, पण प्रवरा सहकारी साखर कारखान्यात झाकीर नाईककडून आलेले पैसे हा कळस आहे. याची माहिती आम्ही केंद्रीय तपास यंत्रणांना कळवली असून सरकार बरोबर असलेल्या अनेक मंत्री आमदारांनी आणि साखर सम्राटांनी हजारो कोटींचे घोटाळे केले आहेत. या सगळ्या घोटाळ्यामधून सुटका व्हावी म्हणूनच हे लोक भाजपामध्ये गेले आहेत,” असा आरोप संजय राऊत यांच्याकडून करण्यात आला होता.