मुंबई : लोकसभा निवडणुकीतील (Maharashtra Politics) शेवटच्या टप्प्यातील मतदान 1 जून रोजी पार पडणार आहे. लोकसभेच्या निवडणुकीनंतर राज्यामध्ये विधान परिषदेची निवडणूक पार पडणार आहे. महाराष्ट्रातील राजकीय पक्ष आता या आगामी निवडणुकीच्या तयारीला लागले असून ठाकरे गटाने काही दिवसांपूर्वी या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर आपल्या दोन उमेदवारांच्या नावाची घोषणा केली होती. यानंतर आता मनसेनी निवडणुकीसाठी उमेदवाराची घोषणा केली आहे.
विधान परिषदेसाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेनं आपला पहिला उमेदवार रिंगणात उतरवला आहे. मनसे नेते अभिजीत पानसे यांना मनसेकडून कोकण पदवीधर मतदारसंघासाठी उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. अभिजित पानसे हे मनसे प्रमुख राज ठाकरे यांचे जुने सहकारी आहेत, त्यांनी अनेक वर्ष विद्यार्थी सेनेचं काम केलं आहे. आता त्यांना राज ठाकरे यांच्याकडून कोकण पदवीधर मतदारसंघातून उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे.
कधी होणार निवडणूक?
सुधारीत निवडणूक कार्यक्रामानुसार या मतदारसंघात उमेदवारी अर्ज भरण्यासाठी 31 मे पासून सुरुवात होणार आहे, शेवटची तारीख 7 जून असणार आहे. 10 जून रोजी अर्जाची छाननी होईल, बारा तारखेपर्यंत उमेदवारी अर्ज मागे घेता येईल. तर 26 जूनला मतदान होणार असून 1 जुलैला निकाल जाहीर होणार आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.