मुंबई : मागच्या काही महिन्यांपासून बहुचर्चेत असणारा राज्यातील सत्तासंघर्षाचा निर्णय आज सुप्रीम कोर्टाने (Supreme Court) जाहीर केला आहे. हा निर्णय उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांना दिलासा देणारा आहे. तसेच कोर्टाच्या या निर्णयामुळे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांना मोठा धक्का बसला आहे. या निर्णयानंतर आता ठाकरे गटाकडून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली आहे.
नैतिकतेच्या मुद्द्यावर एकनाथ शिंदे यांनी राजीनामा द्यावा अशी मागणी संजय राऊत आणि अनिल परब यांनी केली आहे.’उद्धव ठाकरेंचं सरकार बेकायदेशीरपणे घालवलं आणि हे सरकार घटनाबाह्य आहे. 16 आमदारांचा निकाल विधानसभा अध्यक्षांकडे येणार असेल तर येऊ द्या, व्हीपच बेकायदेशीर आहे. संपूर्ण प्रक्रिया बेकायदेशीर आहे.
तसेच विधानसभा अध्यक्षांनी या बेकायदेशीर प्रक्रियेवर भूमिका घ्यायला पाहिजे. शिंदे आणि फडणवीस यांनी उगाच पेढे वाटू नयेत, थोडीतरी नैतिकता असेल आणि खोक्यांची पापं धुवून काढायची असतील, तर सरकारने ताबडतोब राजीनामा द्यायला हवा,’ अशी टीका संजय राऊत (Sanjay Raut) यांनी यावेळी केली. एकनाथ शिंदे यांनी राजीनामा दिला नाही तरी हे सरकार 15 दिवसांमध्ये कोसळेल अशी प्रतिक्रिया अनिल परब (Anil Parab) यांनी दिली आहे.