अहमदनगर : सध्या राज्यात ग्रामपंचायतीच्या निवडणूका पार पडत आहेत. अनेक ठिकाणी अटी तटीची लढत पाहायला मिळत आहे. या सगळ्या ग्रामपंचायतीच्या निवडणूक निकालांमध्ये एक निकालाने मात्र सगळ्यांचे लक्ष वेधून घेतले. हा निकाल आहे अहमदनगर जिल्ह्यातील अरणगाव ग्रामपंचायतीचा. ही संघर्षमय कहाणी आहे सरपंच पोपट पुंड यांची.
सरपंच पोपट पुंड यांचा संघर्ष
वयाच्या विसाव्या वर्षांपासून निवडणूक लढवली मात्र नेहमीच पराभवाला सामोरे जावे लागले. तब्बल 32 वर्षांनंतर वयाच्या 51 व्या वर्षी ग्रामपंचायत निवडणुकीत विजयाचा गुलाल उधळत पोपट पुंड यांनी थेट सरपंचपदाला गवसणी घातलीये. त्यांच्या विजयानंतर अख्ख्या गावाने जोरदार घोषणाबाजी, गुलालाची मुक्त उधळण केली. कार्यकर्त्यांनी पुंड यांना खांद्यावर नाचवत आनंद साजरा केला. नगरपासून अवघ्या पाच-सात किलोमीटरवर अरणगाव आहे. इथल्या ग्रामपंचायतीत माजी मंत्री शिवाजी कर्डिले यांच्या समर्थकांची सत्ता गेली अनेक वर्षे होती. या प्रस्थापित सत्तेला शह देण्याचे काम पोपट पुंड मागची अनेक वर्षे करत होते.
सरपंच पोपट पुंड यांचा प्रवास
पुंड यांनी वयाच्या 20 व्या वर्षी गावचे सरपंच व्हायचे म्हणून स्वप्न पाहिले.
मधल्या काळात त्यांनी 2002 ला पंचायत समिती
तर 2014 ला सरपंच होण्यासाठी निवडणूक लढवली
पण त्यांना थोड्याफार मतांनी 32 वर्षे पराभवाला सामोरे जावं लागलं
मात्र वयाच्या 51 वर्षी त्यांचं निवडणुकीतील अपयशाचं ग्रहण सुटलं आणि ते सरपंच झाले
सातत्याने पराभव पाहावा लागत असला तरी त्यांनी जिद्द सोडली नव्हती.
गावामधील लोकसेवेची कामे त्यांची सुरू होती. जनसंपर्क चांगला होता.
सत्तेत नसले तरी गावच्या विकासासाठीच्या शासनाच्या योजना गावात कशा येतील, यासाठी त्यांचे प्रयत्न आणि पाठपुरावा सुरू होता.
नगर तालुक्यातील अरणगाव ग्रामपंचायतवर राष्ट्रवादी अजित पवार गटाचे आमदार निलेश लंके यांचं वर्चस्व आहे. त्यात पोपट पुंड यांनी 12 सदस्यांसह सरपंचपदावर बाजी मारल्यामुळे माजी मंत्री शिवाजी कर्डिले आणि भाजप खासदार सुजय विखे पाटील यांच्या पॅनलचा दारुण पराभव झाला. या निकालामुळे दोन्ही नेत्यांना मोठा धक्का बसला आहे.