ज्यांनी शिवसेनेसोबत बेईमानी केली त्यांच्यावर त्यांच्या बायकासुद्धा भरोसा करणार नाहीत इतकंच काय तर त्यांची
मुलंसुद्धा अविवाहित मरतील…
……………………….
शिवसेनेत मोठी बंडखोरी होऊनही उद्धव ठाकरे आणि ‘मातोश्री’शी एकनिष्ठ राहिल्यामुळं हिंगोलीत ज्यांचा सत्कार करण्यात आला त्या आमदार संतोष बांगर यांच्या तोंडचं हे वरील वाक्य ! सत्कारावेळी मी किती कट्टर शिवसैनिक आहे हे सांगताना ढसाढसा रडणारे हेच ते संतोष बांगर आज बहुमत चाचणी होण्यापूर्वीच हसत हसत शिंदे गटात सामील झाले. आधी ढसाढसा रडले आणि आता हसत हसत शिंदे गटात शिरले.
………………………..
शिंदे गटात अब तक चालीस…!
आमदार संतोष बांगर यांनी बंडखोरी केल्यानं शिवसेनेतून शिंदे गटाला जाऊन मिळाल्या बंडखोरांची संख्या आता 40 झाली आहे. त्यामुळं उद्धव ठाकरे यांच्यासोबत असलेल्या आमदारांची संख्या आता फक्त 15 उरलीये. एकेकाळी ‘मी कट्टर शिवसैनिक, मी बाळासाहेबांचा शिवसैनिक’ म्हणणारे आज ‘कटर’ शिवसैनिक बनलेत. शिवसेनेच्या या फुटीर 40 आमदारांसह 10-12 अपक्ष आमदारही या बंडाच्या छावणीत घुसले आहेत. त्यामुळं भविष्यात आणखी कोण कोण शिंदे गटाच्या गळाला लागणार आणि हा फुगवटा किती वाढत जाणार हे सांगणं आजच्या घडीला तरी अवघड आहे.
……………………………..
शिवसेनेतील उरल्या-सुरल्यांचं काय ?
शिवसेनेत सध्याच्या घडीला आदित्य ठाकरे (वरळी), नितीन देशमुख (बाळापूर), राहुल पाटील (परभणी), सुनील राऊत (विक्रोळी), रमेश कोरगावकर (भांडूप पश्चिम), रवींद्र वायकर (जोगेश्वर पूर्व), प्रकाश फातर्फेकर (चेंबूर), संजय पोतनीस (कलिना), अजय चौधरी (शिवडी), शंकरराव गडाख (नेवासा), कैलास पाटील (उस्मानाबाद), भास्कर जाधव (गुहागर), वैभव नाईक (सावंतवाडी), सुनील प्रभू (दिंडोशी), राजन साळवी (राजापूर) असे एकूण 15 आमदार उरले आहेत. ‘आम्ही उद्धव साहेबांशी एकनिष्ठ आहोत आणि राहू,’ असं म्हणणारे 40 जण आज शिंदे गटाला जाऊन मिळाले आहेत. त्यामुळं एक आदित्य ठाकरे सोडल्यास उरल्या-सुरल्यांवर किती आणि कसा विश्वास ठेवायचा हा यक्ष प्रश्न आज शिवसेना नेतृत्त्व आणि तमाम शिवसैनिकांसमोर उभा ठाकलाय.
थोडक्यात काय तर एकीकडं शिवसेनेला गळती लागली असताना दुसरीकडं शिंदे गटाला मात्र भरती आलीये हे नक्की !
– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक
TOP NEWS मराठी