लातूर : अहमदपूर विधानसभा मतदारसंघ निवडणुकीचे पडघम आज पासुनच सुरू (Latur News) झाल्याची स्थिती आहे. माजी आमदार विनायकराव पाटील यांनी भाजपाला रामराम करत शरद पवारांच्या राष्ट्रवादीत प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे. हा निर्णय स्वत: विनायकराव पाटीलांनी जाहीर केला आहे. 29 ऑक्टोबर रोजी ते शदर पवार यांच्या उपस्थितीत यशवंतराव चव्हाण सभागृहात पक्षप्रवेश करणार आहेत.
‘या’ कारणामुळे पक्ष सोडण्याचा घेतला निर्णय?
यावेळेस ही गटबाजी संपेल आणि आपली उमेदवारी निश्चित होईल अशी आशा विनायकराव पाटील यांना होती. मात्र जिल्हाध्यक्षपदी त्याच्या निवडणुकीत बंडखोरी केलेले उमेदवार दिलीपराव देशमुख यांची वर्णी लागली. यामुळे विनायकराव पाटील समर्थक गटामध्ये अस्वस्थता वाढली होती. त्यातच भाजपाचे जिल्ह्यामध्ये अनेक गट तट तयार झाल्याने विनायकराव पाटील यांची भाजपामध्ये घुसमट होत होती. त्यातच सगळे विरोधक हे एकत्र आलेत त्यांच्या विरोधात सक्षमपणे उभे राहिल्यास मतदार आपल्या बाजूने येतील हे लक्षात घेत विनायकराव पाटील यांनी राष्ट्रवादी (शरद पवार गट) मध्ये प्रवेश करण्याचा निर्णय घेतला आहे.
कोण आहेत विनायकराव पाटील?
विनायकराव पाटील हे लातूरच्या अहमदपूर विधानसभा मतदारसंघातून दोन वेळेस आमदार म्हणून निवडून आलेत.राज्यमंत्री पदी त्यांनी काम देखील केलं आहे. गत वेळेस भाजपातील गटबाजीचा फटका त्यांना बसला होता.यात त्यांचा पराभव झाला.पण त्यांचा हा निर्णय अहमदपूरचे राष्ट्रवादीचे आमदार बाबासाहेब पाटील यांच्यासाठी त्रासदायक ठरण्याची चिन्ह सध्या आहेत. गेल्या वेळेस राष्ट्रवादीच्या तिकिटावर निवडून आलेले बाबासाहेब पाटील हे अजित पवार गटाचे खंदे समर्थक म्हणून ओळखले जातात.