सांगली : मागच्या काही दिवसांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अनेक घडामोडी झाल्याचे पाहायला मिळाले. शरद पवार यांनी आपल्या पुस्तक प्रकाशनाच्या कार्यक्रमात पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा दिला. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये मोठी खळबळ उडाली होती. यानंतर राष्ट्रवादीचे सर्व दिग्गज नेते आणि कार्यकर्त्यांनी शरद पवार यांना सभागृहात घेराव घालून राजीनामा मागे घेण्याची मागणी केली. मात्र शरद पवार आपल्या निर्णयावर ठाम राहिले.
यानंतर निवडसमितीची एक बैठक पार पडली. यामध्ये शरद पवार यांच्या पक्षाध्यक्ष पदाचा राजीनामा नामंजूर करण्याचा आणि शरद पवार यांनाच अध्यक्षपदी काय ठेवायचं असे दोन प्रस्ताव सर्वानुमते मंजूर करण्यात आले. निवड समितीचा हा निर्णय शरद पवार यांना कळवण्यात आला. त्यानंतर शरद पवार यांनी पत्रकार परिषद घेऊन निवड समिती, नेते आणि कार्यकर्त्यांचा मान राखत आपला निवृत्तीचा निर्णय मागे घेत असल्याचे जाहीर केले होते. यानंतर आता राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी मोठा गौप्यस्फोट केला आहे.
नेमकं काय म्हणाले जयंत पाटील?
शरद पवारांचा राजीनामा कायम राहण्यासाठी बरेच जण देव पाण्यात घालून बसले होते. राष्ट्रवादीपासून शरद पवार बाजूला गेले असते तर अनेक प्रश्न निर्माण झाले असते, असा गौप्यस्फोट जयंत पाटील यांच्याकडून करण्यात आला आहे. त्यांनी केलेल्या या वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आले आहे. जयंत पाटील यांच्या या वक्तव्यानंतर त्यांचा इशारा नेमका कोणाकडे आहे? हा प्रश्न उपस्थित झाला आहे.
बारसूवरून सरकारवर साधला निशाणा
यावेळी जयंत पाटील यांनी बारसू रिफायनरीवरून सरकारवर जोरदार निशाणा साधला आहे. जर बारसूला स्थानिकांचा विरोध होत असेल तर त्यांचे समाधान करण्याचे काम सरकारचे आहे. स्थानिकांना विश्वासात घेऊन काम होणं गरजेचं आहे. मात्र जर लोकांना विश्वासात नाही घेतलं तर अनेक प्रश्न निर्माण होतात असे म्हणत त्यांनी सरकारवर टीका केली आहे.