सांगली : मागच्या काही दिवसांपासून राष्ट्रवादी पक्षातील वाद चव्हाट्यावर येऊ लागले आहेत. पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्या राजीनामनानाट्यानंतर हे वाद अधिक उफाळून आले. काही दिवसांपूवी शरद पवार यांनी पक्षाच्या कार्यध्यक्षपदाच्या नावाच्या घोषणा केल्या. यानंतर अजित पवार यांनी उघडपणे नाराजी बोलून दाखवली. यादरम्यान पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील (Jayant Patil) राष्ट्रवादी सोडणार असल्याच्या चर्चा मोठ्या प्रमाणात रंगल्या. ते (Jayant Patil) राष्ट्रवादी का सोडणार यासंदर्भात 10 प्रमुखं कारणंदेखील समोर आली आहेत. ती नेमकी कोणती कारणे आहेत चला पाहूया….
1) शरद पवार यांनी 2019 नंतर जयंत पाटील यांना झुलवत ठेवलं. कधीकाळी गृहमंत्रीपद भूषविलेल्या जयंत पाटील यांना गृहमंत्रीपद देण्याऐवजी जलसंधारण मंत्रीपद दिलं. ही जयंत पाटील यांची नाचक्की होती.
2) सध्या राष्ट्रवादीत दोन गट आहेत. एक सुप्रिया सुळे यांचा आणि दुसरा अजित पवार यांचा. जयंत पाटील या दोन्ही गटाचे नाहीयेत. त्यामुळे त्यांचं राष्ट्रवादीतील भविष्य अंधारातच राहिलं.
3) जयंत पाटील हे महत्त्वकांक्षी नेते आहेत. पण त्यांना आपण केवळ नामधारी प्रदेशाध्यक्ष असल्याचं वाटतंय. कारण सुप्रिया सुळे आता पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारी अध्यक्षा झाल्या आहेत. तर राज्य स्तरावरील सर्व निर्णय अजित पवार घेत आहेत. त्यामुळे जयंत पाटील अस्वस्थ आहेत.
4) सुप्रिया सुळे यांना राष्ट्रीय पातळीवर जबाबदारी देण्यात आली आहे. अजित पवार यांची नजर आता प्रदेशाध्यक्षपदावर आहे. प्रदेशाध्यक्षपद अजित पवारांकडे गेलं तर जयंत पाटील जाणार कुठे?
5) महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर जयंत पाटील यांना विरोधी पक्षनेतेपद दिलं जाऊ शकलं असतं. पण शरद पवार यांनी तसं केलं नाही.
6) शरद पवार यांनी पक्षातील दोन्ही गटांना खूश केलं. सुप्रिया सुळे यांना कार्यकारी अध्यक्ष केलंय. तर प्रफुल्ल पटेल यांनाही कार्यकारी अध्यक्ष केलंय. प्रफुल्ल पटेल हे अजित पवारांच्या जवळचे आहेत. ही निवड करताना जयंत पाटील यांचा विचार झाला नाही.
7) शरद पवार यांनी राजकारणातून पूर्णपणे निवृत्ती घेतली तर जयंत पाटील हे त्यांच्यापेक्षा ज्युनिअर असलेल्या सुप्रिया सुळे आणि अजित पवार यांच्या हाताखाली कसे काम करतील?
8) जयंत पाटील यांना आपला मुलगा प्रतिक पाटील याला राजकारणात आणायचं आहे. त्यासाठी त्यांना मुलाला राजाराम बापू साखर कारखान्याचा अध्यक्षही केलं आहे. पण शरद पवार यांच्याकडून जयंत पाटील यांना काहीच प्रतिसाद मिळताना दिसत नाहीये.
9) शरद पवार यांनी अजित पवार यांचे चिरंजीव पार्थ पवार यांच्याकडे कोणतीही संघटनात्मक जबाबदारी दिलेली नाही. मग जयंत पाटील यांच्या मुलाला काय मिळणार?
10) त्यामुळेच जयंत पाटील यांना राष्ट्रवादीत आपलं आणि मुलाचं भवितव्य दिसत नाहीये. शरद पवार यांच्या राजीनामाच्या वेळी जयंत पाटील यांनी भलेही रडण्याचा ड्रामा केला असेल पण वास्तविक जयंत पाटील राष्ट्रवादीत वैतागले आहेत. त्यामुळेच ते लवकरच पक्षाला सोडचिठ्ठी देऊ शकतात.