मुंबई: शिवसेना नेते राज्याचे माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम शिवसेनेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतला असून त्यांनी आपल्या शिवसेना नेते पदाचा राजीनामा शिवसेना पक्षप्रमुख आणि राज्याचे माजी मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांच्याकडे सुपूर्त केला आहे.
राज्यात महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यापासूनच रामदास कदम हे नाराज असल्याचं पाहायला मिळालं जर शिवसेना पक्षप्रमुख हिंदुहृदसम्राट बाळासाहेब ठाकरे असते तर आपल्यावर ही वेळच आली नसती असं म्हणत त्यांनी उद्धव ठाकरे यांच्यावरच पत्रातून निशाणा साधला आहे.
-
कसा आहे रामदास कदम यांचा राजकीय प्रवास
-
रामदास कदम यांचा जन्म 27 जुलै 1953 रोजी झाला. ते निष्ठावंत शिवसैनिक म्हणून ओळखले जातात.
-
रत्नागिरीमधील खेड मतदारसंघातून ते निवडून येत असले तरी त्यांच्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात मुंबईतील कांदिवली येथून झाली आहे. शिवसेनाप्रमुखांनी बजाव पुंगी, हटाव लुंगी आंदोलन सुरू केल्यावर रामदास कदम शिवसेनेच्या आंदोलनात सहभागी झाले.
-
कांदिवली गटप्रमुख, उपशाखाप्रमुख, शाखाप्रमुख, खेडचे आमदार अशी त्यांची राजकीय कारकीर्द वाढत गेली आणि शिवसेनेचे महत्त्वाचे नेते म्हणून त्यांना ओळख मिळाली.
-
1990 साली ते खेड मतदारसंघात विजयी झाले. त्यानंतर 1995, 1999, 2004 अशा विधानसभा निवडणुका जिंकले.
-
1995 साली युतीच्या सरकारमध्ये ते पहिल्यांदा अन्न आणि नागरी पुरवठा मंत्री होते तसेच गृहराज्यमंत्री होते.
-
2005 साली त्यांची विधानसभेतील विरोधीपक्षनेतेपदी निवड झाली. या काळात त्यांनी आघाडी सरकारवर विविध प्रश्नांच्या निमित्ताने टीकास्त्र सोडले होते. नारायण राणे यांनी काँग्रेसमध्ये प्रवेश केल्यानंतर झालेली पोकळी भरुन काढण्याचा प्रयत्न त्यांनी केला होता.
-
2009 साली रामदास कदम रत्नागिरीतील गुहागर मतदारसंघातून पराभूत झाले. राष्ट्रवादीचे भास्कर जाधव यांनी कदमांचा पराभव केला होता. त्यानंतर कदमांना शिवसेनेनं विधानपरिषदेत पाठवलं.
-
2014 सालीही रामदास कदम पुन्हा विधानपरिषदेत गेले. मात्र, 2014 साली विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना-भाजपनं एकत्र येत राज्यात सत्ता स्थापन केली. या सत्तेत रामदास कदम यांना पर्यावरण मंत्रिपद देण्यात आलं. पर्यावरण मंत्री असताना प्लास्टिक बंदीचा घेतलेला निर्णय विशेष गाजला.
-
2019 च्या विधानसभा निवडणुकीत मात्र रामदास कदम यांनी विधानसभा लढवण्यास नकार दिला. मात्र, मुलगा योगेश कदम याला दापोली मतदारसंघातून उमेदवारी मिळाली आणि तिथं राष्ट्रवादीचे संजय कदम यांना पराभूत करून योगेश कदम विधानसभेत पोहोचले.