‘किरीट सोमय्या भाजपाचे ‘आयटम गर्ल’…
‘ज्याची बायको पळते त्याचं नाव ‘मोदी’ ठरतं…’
‘चिवा’, ‘चंपा’…, ‘किशोरी पेंग्विनकर’…
‘म्याव म्याव…’ आणि असं बरंच काही !!
नेतेमंडळींच्या वारंवार घसरणाऱ्या जिभा पाहाता महाराष्ट्राच्या राजकारणात हे चाललंय तरी काय, असं म्हणत कपाळी हात मारून घेण्याची वेळ आलीये. त्यांच्या जिभांतून सुटलेली बेछूट, बेताल, वादग्रस्त विधानं पाहिली तर महाराष्ट्राच्या राजकारणात या वाचाळवीरांनी स्वतःचा ‘माल’ तयार करणारी एखादी फॅक्टरी टाकलीये की काय, असा संशय बळावतो. राजकारणात वावरताना तोल, ताल आणि संयम सुटला, की ही अशी ‘बरळशाही’ सुरू होते. वाद-प्रतिवाद नि आरोप-प्रत्यारोपाच्या खेळात मग कोण काय बरळून जाईल, याचा थांगपत्ताच लागत नाही. बरं, ही मंडळी अशी बेताल वक्तव्यं करून जणू आम्ही असं काही बोललोच नाही, असा युक्तिवाद करून नामानिराळे होतात आणि मी कसा टोला हाणला, हे गौरवानं मिरवतात. राजकारणात तर आजकाल पातळी सोडून बोलणाऱ्या नेत्यांना कमालीचा भाव चढलाय.
आमच्या नेत्यानं तुमच्या नेत्याची कशी जिरवली..?
कुणाविषयी बोलताना अथवा एखाद्यावर आरोप करताना जो जितकी मर्यादा ओलांडेल किंवा जितकी खालची पातळी गाठेल, तो नेता माध्यमांचा केंद्रबिंदू ठरतो आणि त्याच्या चेल्या-चपेट्यांच्या गळ्यातील ताईत बनतो. मग मात्र त्याच्या बेताल वक्तव्याची री ओढत त्याचे चाहते, ‘आमच्या नेत्यानं तुमच्या नेत्याची कशी जिरवली,’अशा फुशारक्या मारत टेंभे मिरवतात. हा बेताल वक्तव्यांचा खेळ काही प्रमाणात जनतेची करमणूक करतो हे खरं पण कालांतरानं हीच जनता मग या नेत्यांची पारा-पारावर आणि गल्ली-बोळांत चेष्टा करत असल्याचंही पाहायला मिळतं.
निवडणुकांचा हंगाम जवळ आला, की ही नेतेमंडळी आपली जीभ सैल सोडतात आणि जनतेकडून टाळ्याही पिटून घेतात. जनतेचे प्रश्न, विकासाचे मुद्दे, भ्रष्टाचार, नैसर्गिक आपत्ती आदी मूळ प्रश्नांना सोयीस्कर बगल देत निव्वळ बेताल वक्तव्यांच्या जोरावर जनतेची मती भ्रमित करायची, त्यांची मतं खिशात टाकायची आणि पुढली पाच वर्षे खुर्ची टिकवून ठेवायची हे या वाचाळवीरांना चांगलंच जमू लागलंय.
या वाचाळवीरांचे कान उपटायचे तरी कुणी ?
प्रत्येक राजकीय पक्षात थोड्या-बहुत प्रमाणात ‘वाचाळवीर’ आहेत हे त्या त्या पक्षाचे बडे नेते नक्कीच मान्य करतील. अनेकदा, ‘तू अथवा तुम्ही असं बोलायला नको होतं,’ असं या बड्या नेत्यांनी खासगीत त्यांना समजावलं देखील असेल पण इकडं एकाचं तोंड दाबून धरलं तर तिकडं दुसरं कुणी तरी तोंड उघडतंय. त्यामुळं कुणा कुणाची म्हणून तोंडं धरायची असा प्रश्न बहुधा त्यांनाही पडला असेल पण या वाचाळवीरांना वेळीच आवरलं नाही तर आपली पक्षीय हानी होऊ शकते, हे लक्षात घेऊन प्रत्येक पक्षातल्या बड्या, जुन्या-जाणत्या नेत्यांनी या वाचाळवीरांचे कान वेळीच उपटायला हवेत हे नक्की !
… ही तर वाचाळवीरांची फॅक्टरी !
अलिकडं महाराष्ट्राच्या राजकारणाकडं पाहिलं असता प्रत्येक पक्षातील वाचाळवीरांनी मिळून या अशा बेताल वक्तव्यांची निर्मिती करणारी जणू फॅक्टरीच टाकलीये की काय, असा संशय बळावतो. बरं, प्रत्येकाच्या फॅक्टरीतला ‘माल’ हा वेगवेगळा ! आणि एकदा का आपल्या फॅक्टरीतला ‘माल’ खपतोय याची खात्री झाली, की मग डे-नाईट शिफ्टमध्ये त्याचं जोरदार ‘प्रॉडक्शन’ सुरू..! अलिकडं तर दिवसातून सकाळ-दुपार-संध्याकाळ कुणी ना कुणी तरी कुठं तरी बरळताना दिसतोच आहे. या वाचाळवीरांचा हा ‘माल’ राजकारणाच्या बाजारात असाच खपत राहिला तर ‘ढवळ्या शेजारी बांधला पवळ्या, वाण नाही पण गुण लागला’ या म्हणीनुसार जे आज थोडे-बहुत चांगलंचुंगलं बोलतायत ते सुद्धा उद्या यांच्या नादी लागून नको ते बरळू लागतील. त्यामुळं काहीही करा पण या वाचाळवीरांना कुणी तरी आवरा रे, असं म्हणायची वेळ आता येऊन ठेपलीये. वाचाळवीरांची ही फॅक्टरी वेळीच बंद पाडली नाही तर या फॅक्टरीत तयार होणारा हा ‘माल’ महाराष्ट्राची राजकीय संस्कृती आणि सभ्यतेला एकदिवस भंगारात काढल्याशिवाय राहणार नाही.
– संदीप चव्हाण
वृत्तसंपादक, TOP NEWS मराठी