पुणे : शिवसेनेचे मंत्री आणि नेते दीपक केसरकर (Deepak Kesarkar) यांनी नुकताच एक मोठा गौप्यस्फोट केला आहे. त्यांनी केलेल्या या गौप्यस्फोटामुळे राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे. मविआ सरकार असताना उद्धव ठाकरे युती तोडायला तयार होते, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत ते दिल्लीमध्ये बोलणार होते. त्यांची युती होणार होती असा दावादेखील दीपक केसरकर यांनी यावेळी केला.
नेमके काय म्हणाले दीपक केसरकर?
महाविकास आघाडीचं सरकार असताना उद्धव ठाकरे आघाडी तोडायला तयार होते. पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि गृहमंत्री अमित शाह यांच्यासोबत त्यांचं दिल्लीमध्ये बोलणं होणार होतं. त्यांची युती होणार होती. मात्र संजय राऊत यांनी हे शरद पवार आणि अजित पवार यांना जाऊन सांगितलं. मग आता तुम्हीच सांगा खलनायक कोण आहे ते? एकनाथ शिंदे दुसरं काहीही मागत नव्हते, त्यांचं म्हणणं फक्त एवढंच होतं की आपण भाजपसोबत जाऊ असा गौप्यस्फोट दीपक केसरकर यांनी केला आहे. त्यांच्या या खळबळजनक वक्तव्यामुळे राजकीय वर्तुळात चर्चाना उधाण आले आहे.
यावेळी दीपक केसरकर यांनी मराठा आरक्षणावर देखील आपली प्रतिक्रिया दिली आहे. मराठी समाजाला आरक्षण देण्यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. गेल्यावेळी सुप्रीम कोर्टात आरक्षण टीकलं नाही. आरक्षण देण्याची सरकारची भूमिका आहे, ते फक्त टीकणारं आरक्षण असावं. त्यामुळे ते टीकण्यासाठी काय करता येईल हे आता पाहिलं पाहिजे असं केसरकर म्हणाले आहेत.