मुंबई : काही दिवसांपूर्वी सर्वोच्च न्यायालयाने (Supreme Court) महाराष्ट्रातील सत्तासंघर्षाबाबत महत्वपूर्ण निकाल दिला होता. यानंतर राज्यातील नेते एकमेकांवर आरोप- प्रत्यारोप करू लागले. यावर आता मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाने आपली प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्र विधानसभा (Maharashtra Legislative Assembly) बरखास्त करून नव्याने निवडणूक घ्यावी, अशी मागणी माकपने केली आहे. तसेच सर्वोच्च न्यायलयाच्या निकालानंतर राज्यात नवे सरकार स्थापन करण्याची आवश्यकता असल्याचे देखील माकपने (MCP) म्हंटले आहे.
नेमके काय म्हणाले डॉ. उदय नारकर ?
महाराष्ट्राचे भाजप-प्रणित शिंदे-फडणवीस सरकार अत्यंत अनैतिक आणि बेकायदेशीर पायावर उभे असल्याचे सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या निकालावरून स्पष्ट झाले आहे अशी प्रतिक्रिया मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे राज्य सचिव डॉ. उदय नारकर यांनी दिली आहे. तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निकालानंतर राज्याला पर्यायी सरकार मिळाले पाहिजे. तथापि, राज्यात पर्यायी सरकार स्थापन होण्यासारखी आज परिस्थिती नाही, असेदेखील डॉ. उदय नारकर (Dr. Uday Narkar) म्हणाले आहेत.
तसेच शिवसेनेतून फुटून गेलेल्या आमदारांवर अपात्रतेची टांगती तलवार आहे. त्यामुळे हे सरकार आणखी अस्थिर होऊ शकते. भाजप गैरमार्गाने आपले बहुमत करायच्या प्रयत्नात असल्याचे दिसत आहे. त्यामुळे राज्यात भाजपच्या (BJP) पुढाकाराने घोडेबाजाराला जास्तच ऊत येईल, अशी भीतीदेखील माकपकडून व्यक्त करण्यात आली आहे.