गेल्या काही दिवसांमधील राजकारण बघता सर्वसामान्य माणसांना म्हणजेच मतदारांना आश्चर्याचे धक्के बसतील अशा अनेक घटना घडल्या आहेत. मात्र लोकसभा निवडणुकीच्या रणसंग्राम सुरू झाल्यानंतर अनेक नेतेमंडळींनाच आश्चर्याचे आणि चिंतेचे धक्के सहन करावे लागत आहेत. असेच धक्के भाजपने त्यांच्याच सहा विद्यमान खासदारांना तिकीट नाकारून दिलेत. पाहूया कोण आहेत हे विद्यमान खासदार आणि त्यांना तिकीट नाकारण्याची नेमकी कारणे काय आहेत…
1) प्रीतम मुंडे
बीडच्या विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांचं तिकीट कापून त्यांच्या जागी त्यांच्याच भगिनी पंकजा मुंडे यांना तिकीट देण्यात आलं. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत पंकजा मुंडे यांचा बंधू धनंजय मुंडे यांनी दारून पराभव केला होता. त्यानंतर भाजपने त्यांना विधान परिषदेवरही संधी दिली नाही. त्यामुळे नाराज झालेल्या पंकजा मुंडे काही दिवस राजकारणापासून लांब राहिल्या. त्यांची हीच नाराजी दूर करण्यासाठी भाजपने त्यांना बीड लोकसभेचे तिकीट दिलं. मात्र त्यामुळे विद्यमान खासदार प्रीतम मुंडे यांच्या कार्यकर्त्यांमध्ये नाराजीचा सूर पाहायला मिळतोय. त्यामुळेच प्रीतम मुंडे यांचं पुनर्वसन केंद्रीय पातळीवर करण्याच्या भाजपच्या हालचाली सुरू असल्यास बोललं जात आहे.
2) संजय धोत्रे
भाजपने अकोल्याचे खासदार संजय धोत्रे यांच्याबाबतही हीच खेळी खेळली आहे. वीस वर्षांपासून सातत्याने खासदार म्हणून निवडून येत असलेले संजय धोत्रे यांचे तिकीट कापून त्यांचेच पुत्र अनुप धोत्रे यांना लोकसभेची उमेदवारी दिली आहे. सातत्याने पक्षाचे काम करत असल्यामुळे उमेदवारी मिळण्याची अपेक्षा संजय धोत्रे यांना होती. मात्र मुलालाच उमेदवारी मिळाल्यामुळे धोत्रे यांनी नाराजी व्यक्त केली नाही.
3) गोपाळ शेट्टी
मुंबईतील लोकसभा मतदारसंघातही अशाच प्रकारे भाजपने विद्यमान खासदारांची तिकिटं कापली आहेत. उत्तर मुंबईचे खासदार गोपाळ शेट्टी यांच्या ऐवजी केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली. त्यावर ‘काही लोकांना तिकीट मिळतं, काहींना मिळत नाही. पक्षाने तिकीट नाकारलं असेल तर त्यामागे काही कारण असेल. काही कार्यकर्ते नाराज आहेत मात्र ते स्वाभाविक असून महायुतीचे अधिकृत उमेदवार पियुष गोयल यांना चांगल्या मतांनी निवडून आणण्यासाठी मी प्रयत्न करेन’, अशी प्रतिक्रिया त्यांनी दिली आहे. उत्तर मुंबई परिसरात उत्तर भारतीय नागरिकांची लोकसंख्या मोठ्या प्रमाणात आहे. त्यामुळेच या भागात उत्तर भारतीय चेहरा असलेले पियुष गोयल यांना उमेदवारी देण्यात आली.
4) मनोज कोटक
ईशान्य मुंबईचे खासदार मनोज कोटक यांचेही तिकीट कापण्यात आलं. त्यांच्या जागी मिहीर कोटेचा यांना उमेदवारी देण्यात आली. मनोज कोटक यांनी ईशान्य मुंबईत समाधानकारक काम केलं असल्याचं स्थानिकांचं मत आहे. त्यांचा जनसंपर्क हे दांडगा आहे. त्यामुळे त्यांचं तिकीट कापून मिहीर कोटेचा यांना तिकीट देण्यामागचं नेमकं कारण अद्यापही अस्पष्ट आहे.
5) उन्मेश पाटील
जळगावचे विद्यमान खासदार उन्मेश पाटील यांचे तिकीट कापून त्यांच्या जागी स्मिता वाघ यांना उमेदवारी जाहीर करण्यात आली आहे. त्यामुळे उमेश पाटील आणि त्यांचे कार्यकर्ते प्रचंड नाराज असल्याचं चित्र समोर येत आहे. त्यामुळेच पाटील हे महाविकास आघाडीच्या वाटेने जाण्याची शक्यता वर्तवली जात आहे. मात्र याबाबत पाटील यांनी स्वतः कोणतीही भूमिका स्पष्ट केलेली नाही.
6) जयसिद्धेश्वर स्वामी
या यादीतील सध्या प्रचंड चर्चेत असलेला मतदार संघ म्हणजेच सोलापूर मतदार संघाचे विद्यमान खासदार जयसिद्धेश्वर स्वामी यांचे तिकीट कापून राम सातपुते यांना उमेदवारी देण्यात आली. जय सिद्धेश्वर स्वामी यांनी उमेदवारी अर्ज दाखल केला. त्यावेळी त्यांनी बेडाजंगम जातीचा दाखला दिला होता जो समितीने अवैद्य ठरवला. त्यामुळे त्यांची खासदारकी रद्द होण्याची शक्यता होती. मात्र जात पडताळणी समितीने अवैद्य ठरवलेला जातीचा दाखला रद्द करण्याचा आदेश न्यायालयाने फेटाळल्यामुळे त्यांचे खासदारकी टिकून राहिली. मात्र आता उमेदवारी न दिल्यामुळे नाराज झालेल्या स्वामींनी तात्काळ उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. त्यांच्या या भेटीतून त्यांची नाराजी दूर करण्याचे प्रयत्न केले गेले असल्याचं बोललं जात आहे.
या सहा खासदारांचा आपापल्या मतदारसंघात प्रभाव आहे. यापैकी अनेकांच्या कामाचा आलेखही समाधानकारक आहे. मात्र कोणत्या ना कोणत्या कारणाने त्यांचा तिकीट यंदाच्या लोकसभेत कापण्यात आलय. याचा कमी जास्त प्रमाणात परिणाम भाजपच्या नवीन उमेदवारांच्या मतांवर पडेल. पण या नव्या खेळीमुळे भाजपला लोकसभेत फायदा होणार की तोटा होणार हे येत्या काळात कळेल.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.
IPL 2024 : आयपीएलचं संपूर्ण वेळापत्रक जाहीर
Kangana Ranaut : चर्चेतली उमेदवार कंगणा राणावत
Ram Satpute : चर्चेतला उमेदवार राम सातपुते
Loksabha 2024 : आतापर्यंत भाजपचे 23 उमेदवार जाहीर; कोणाला मिळाली उमेदवारी अन् कोणाचा झाला पत्ता कट?
Satara News : धुलीवंदनाच्या दिवशी महाबळेश्वरमध्ये मोठा अपघात; टेम्पो 400 फूट दरीत कोसळला
IPL 2024 : अखेर ठरलं ! आयपीएलचा फायनल सामना ‘या’ दिवशी ‘या’ मैदानावर खेळवला जाणार
Ahmednagar Crime : अहमदनगर हादरलं ! रंगपंचमीच्या दिवशी पतीने पत्नीसह 2 मुलींना जिंवत जाळलं
Loksabha Election : अखेर ठाकरेंचं ठरलं ! सामनामधून उद्या लोकसभेच्या उमेदवारांची यादी होणार जाहीर
Ujjain Fire : उज्जैनच्या महाकाल मंदिरात भस्म आरतीवेळी गर्भगृहाला भीषण आग
Ram Satpute : भाजपचं पुन्हा धक्कातंत्र ! राम सातपुतेंना सोलापूरमधून उमेदवारी जाहीर