मुंबई : मनसेच्या गोटातून एक मोठी बातमी समोर आली आहे. कालच मनसेचा (Raj Thackeray) गुढीपाडवा मेळावा पार पडला. यानंतर आज लगेच मनसेला मोठा धक्का बसला. मनसेचे सरचिटणीस कीर्ती कुमार शिंदे यांनी मनसेला सोडचिठ्ठी दिली आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची भाजपसोबत जाण्याची भूमिका न पटल्यानं कीर्ती कुमार शिंदे यांनी पक्षाला “जय महाराष्ट्र” केला आहे. मनसे सरचिटणीस आणि मनसेच्या प्राथमिक सदस्यत्वाचा कीर्ती कुमार शिंदे यांनी राजीनामा दिला आहे. फेसबुक पोस्ट करून त्यांनी आपला राजीनामा दिला आहे.
काय लिहिले फेसबुक पोस्टमध्ये?
‘‘अलविदा मनसे!
महाराष्ट्र नवनिर्माण सेना ‘भाजप- शिवसेना- राष्ट्रवादी’च्या महायुतीला बिनशर्त पाठिंबा देत आहे. आम्हाला राज्यसभा नको, विधानपरिषद नको, बाकीच्या वाटाघाटी नको. हा पाठिंबा फक्त नि फक्त नरेंद्र मोदींसाठी आहे…” अध्यक्ष राजसाहेब ठाकरे यांनी गुढीपाडवा मेळाव्यात या शब्दांत आपली भूमिका मांडली आणि त्यांच्या राजकीय भूमिकांचं एक ‘अनाकलनीय’ वर्तुळ पूर्ण झालं.
पाच वर्षांपूर्वी 2019 लोकसभा निवडणुकांच्या धामधुमीत राजसाहेब ठाकरे यांनी भाजप- मोदी- शाहंविरोधात रणशिंग फुंकलं होतं तो माझ्यासाठी (राजकीय पातळीवर) अत्यंत महत्त्वाचा काळ होता. त्या दिवसांत त्यांनी घेतलेल्या सर्व जाहीर- ‘लाव रे तो व्हिडिओ’ सभांना मी उपस्थित होतो आणि सभांमध्ये ते जे भाजप- पंतप्रधान मोदी- शाह यांच्या विरोधात जे तथ्य- विचार मांडत होते त्यांबद्दल सविस्तर लेख लिहून त्यांची भूमिका अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करत होतो.
आज 5 वर्षांनी देशाच्या इतिहासातील अत्यंत निर्णायक क्षणी राजसाहेबांनी त्यांची राजकीय भूमिका बदलली आहे. ती किती चूक, किती बरोबर, हे राजकीय विश्लेषक सांगतीलच. सध्याच्या काळात राजकीय नेते त्यांना हवे तेव्हा त्यांना हवी ती राजकीय भूमिका घेऊ शकतात. पण त्यांच्या विचारांवर विश्वास ठेवून लढणाऱ्यांची कुचंबणा होते. त्यांचं काय?’’ असा सवाल कीर्ती कुमार शिंदे यांनी उपस्थित केला आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.