मध्य प्रदेशातील छतरपूर जिल्ह्यातील बागेश्वर धामचा दिव्य दरबार मुंबईत १८ मार्च रोजी होणार आहे. या कार्यक्रमाकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलं आहे
आज आणि उद्या मीरारोड येथे बागेश्वर बाबा यांचा दरबार आयोजित करण्यात आला आहे. धीरेंद्र शास्त्रींचा सत्संग आणि त्यांच्या दर्शनाची उत्सुकता महाराष्ट्रातील असंख्य भाविकांना आहे. मात्र बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमात मोठा अडथळा निर्माण होण्याची शक्यता आहे. काँग्रेसने या बागेश्वर बाबांचा कार्यक्रम मुंबईत होऊच देणार नाही, असा पवित्रा घेतला आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी बागेश्वर बाबांच्या कार्यक्रमाला विरोध केला आहे.
महाराष्ट्रात अंधश्रद्धा पसरवणाऱ्यांना स्थान नाही, अशी भूमिका नाना पटोले यांनी मांडली. बागेश्वर बाबा हे देशभरात सध्या प्रचंड चर्चेत असलेले व्यक्ती आहेत.
समोरच्या व्यक्तीच्या मनातील ओळखणे, अनोळखी माणसाची माहिती क्षणात सांगणे, अशा प्रकारचे चमत्कार करून दाखवण्याचे दावे बागेश्वर बाबा त्यांच्या दरबारात करत असतात.देशभरातील त्यांच्या भक्तांची संख्याही दिवसेंदिवस वाढतेय. अंधश्रद्धा निर्मूलन संस्थेने मात्र बागेश्वर बाबांच्या या कार्यक्रमाला विरोध केलेला आहे.