कोल्हापूर : शरद पवार यांनी मोठं वक्तव्य केलं आहे. राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट पडलेली नाही. एखादा मोठा गट बाहेर पडला तर त्याला फूट म्हणतात, मात्र राष्ट्रवादीमध्ये तशी स्थिती नसल्याचं पवार यांनी म्हटलं आहे. त्यांच्या या वक्तव्यावर आता प्रहारचे अध्यक्ष आणि आमदार बच्चू कडू (Bachchu Kadu) यांनी प्रतिक्रिया दिली आहे. ते म्हणाले शरद पवार जसे बोलतात तसे ते कधीच करत नाहीत. यासाठी एक संशोधन टीम बसवली पाहिजे असा टोला बच्चू कडू यांनी यावेळी लगावला.
नेमके काय म्हणाले बच्चू कडू ?
बच्चू कडू यांनी शरद पवारांच्या या वक्तव्याचा जोरदार समाचार घेतला आहे. शरद पवार जसे बोलतात तसे कधीच करत नाहीत. यासाठी एक संशोधन टीम बसवली पाहिजे. हा मोठा गेम आहे. शिवसेनेत जे झालं ते राष्ट्रवादीत होईल असं वाटत नाही. काही पर्याय दोघांनी ठेवले असतील, आघाडीत राहून पवार आणि युतीत राहून अजित पवार लढतील नंतर ते दोघे एकत्र येतील. असं बच्चू कडू यांनी म्हटलं आहे.
शरद पवार काय म्हणाले होते?
राष्ट्रवादीमध्ये कोणतीही फूट नसल्याचं शरद पवार यांनी म्हटलं आहे. जर पक्षातील एक मोठा गट बाहेर पडला तर फूट म्हणता येते, मात्र राष्ट्रवादीमध्ये तशी काहीच स्थिती नाही आहे. फक्त पक्षातील काही लोकांनी वेगळी भूमिका घेतली आहे, त्यामुळे त्याला पक्षात फूट पडली असं म्हणता येणार नाही. तसेच प्रत्येकाला भूमिका घेण्याचा अधिकार असतो, ही लोकशाही आहे असं शरद पवार यांनी म्हटलं आहे.