अमरावती : मनोज जरांगे पाटील यांनी तिसऱ्या टप्प्यातील आंदोलनाला (Maratha Reservation) सुरुवात केली आहे. त्यामुळे राज्यातील वातावरण पुन्हा एकदा तापण्याची शक्यता आहे. यादरम्यान आता प्रहार संघटनेचे प्रमुख आणि आमदार बच्चू कडू यांनी मोठं विधान केलं आहे. पवारांनी ओबीसी समाजाला आरक्षण मिळवून दिलं. त्यांनी ठरवलं असतं तर मराठा समाजालाही त्यावेळी आरक्षण मिळालं असतं, अशी टीका बच्चू कडू यांनी केली आहे. अमरावतीमध्ये प्रसार माध्यमांशी बोलताना त्यांनी ही टीका केली.
नेमके काय म्हणाले बच्चू कडू ?
मराठा समाज हा देशातीलच आहे. मराठा समाजाला गृहित धरूनच ओबीसी आरक्षण देण्यात आलं होतं. काहीजण पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यांना ओबीसी आणि मराठा समाजाचं काही देणं-घेणं नाही. शरद पवारांनी एका पत्रामध्ये 52 जातींचा ओबीसीमध्ये समावेश केला होता. त्यामुळे खरे ओबीसी नेते शरद पवार आहेत. पण, 52 जातींमध्ये मराठा समाजाचाही उल्लेख केला असता, तर प्रश्न मिटला असता.
शरद पवार यांनी तेव्हाच जर मराठ्यांना घेतलं असतं तर आता ही भानगड राहिली नसती. पण तेव्हा शरद पवारांनी मराठ्यांना OBC मध्ये घेतलं नाही, त्यांनी ओबीसीचे हित जोपासलं. त्यामुळे आमचा तोच राग आहे की पवार साहेबांनी मराठ्यांना घ्यायला काय अडचण होती, अशी बोचरी टीका आमदार बच्चू कडू केली आहे. यामुळे आता राज्यात नव्या वादाला तोंड फुटण्याची शक्यता आहे.
नवीन अपडेट मिळवण्यासाठी आमचे WhatsApp Group, facebook page ,Instagram, WhatsApp Channel,Twitter जॉइन करा.