बीड : सध्या राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच गाजताना दिसत आहे. यादरम्यान आता राज्याचे कृषीमंत्री धनंजय मुंडे (Dhananjay Munde) यांनी एक मोठे वक्तव्य केले आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांच्या राज्यभरात सभा सुरू आहेत. मराठा समाजाला कुणबीचं प्रमाणपत्र देण्यात यावं अशी मागणी त्यांनी केली आहे. यावर प्रतिक्रिया देताना कृषीमंत्री धनंजय मुंडे यांनी प्रतिक्रिया दिली आहे.
नेमके काय म्हणाले धनंजय मुंडे ?
आरक्षण देताना ते सर्वोच्च न्यायालयात टिकलं पाहिजे आणि संविधानाप्रमाणे असावं. ही सरकारची जबाबदारी आहे, असं धनंजय मुंडे यांनी म्हटलं आहे. ते परळी मतदारसंघातील सिरसाळा येथे आयोजित कृतज्ञता सोहळ्यात बोलत होते. पुढे बोलताना ते म्हणाले की, जात हा माझ्या राजकारणाचा विषय राहणार नाही, ज्या दिवशी मी जात काढेल त्या दिवशी मी राजकारण सोडून घरी बसेल असे धनंजय मुंडे म्हणाले आहेत.
तसेच कोणत्या जातीत जन्माला यावं हे ईश्वराच्या हातात आहे. त्याच्याकडे अर्ज करता येत नाही, हे मला या जातीत पाठवा म्हणून. 1998 पासून धनजय मुंडे यांनी मराठा आरक्षणासाठी लढा दिला आहे. बीड जिल्हा परिषदेत पहिल्यांदा 2007 मध्ये मराठा आरक्षणाचा ठराव घेतला. विधिमंडळाच्या सभागृहात सर्वात जास्त मराठा आरक्षणाची भाषण मी केली आहेत. मुस्लिम बांधवासाठी, धनगर समाजासाठी अन् मराठा समजासाठी आरक्षण मिळावे ही माझी भूमिका आहे. याचबरोबर राज्यातील एकही शेतकरी आत्महत्या करणार नाही, याची जबाबदारीदेखील राज्याचा कृषीमंत्री म्हणून माझ्यावर आहे.