‘खामोशी से जब भर जाओगे, तभी थोडा चीख लेना, वरना मर जाओगे!’ स्त्रीमनातील काळानुकाळ झालेली घुसमट दूर करून त्यांना व्यक्त होण्याची संधी दिली, ती पहिल्या महिला शिक्षिका सावित्रीबाई फुले यांनी!
भारतीय स्त्री शिक्षणाच्या जननी म्हणून ओळखल्या जाणाऱ्या सावित्रीबाई फुले यांनी १८४८ मध्ये पुण्याच्या बुधवार पेठेत भिडेवाड्यात मुलींची पहिली शाळा सुरू केली.महात्मा फुले यांनी शिक्षिका आणि प्राध्यापिका म्हणून शाळेची संपूर्ण जबाबदारी सावित्रीबाईंना दिली. याच शाळेत सावित्रीबाईंनी प्रथम शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले. याठिकाणी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांचे स्मारक व्हावे, यासाठी प्रशासन आणि मनपा यांच्याकडे प्रयत्न केले जात आहेत. ते लवकरात लवकर पूर्ण व्हावे यासाठी सामर्थ्य प्रबोधिनी या सामाजिक संस्थेच्या माध्यमातून आज दगडूशेठ हलवाई मंदिर चौक येथे पुन्हा एकदा सावित्रीबाई फुले यांची प्रतिकात्मक स्वरूपात शाळा भरवण्यात आली. सावित्रीबाई फुले यांच्या वेशातील युवतीने शालेय विद्यार्थ्यांशी संवाद साधला.
प्रवाहाविरुद्ध जाऊन त्यांनी स्त्री शिक्षणाचा पुरस्कार केला आणि स्त्रियांना, मुलींना आत्मनिर्भरतेने जगायला शिकवले. अशा सावित्रीबाई फुले यांना विनम्र अभिवादन.