आजची जीवन जगण्याची पद्धत ही पूर्वीपेक्षा खूप वेगळी आहे आणि त्यात शहरीभागातील तर अजुनच वेगळी आहे. आजच्या धावत्या युगात बहुतांश कामं हे मशीनच करत असतात. नोकरी करत असलेल्या व्यक्तीचं कामाचं प्रमाण खूप वाढले आहे.चालणे खूप कमी झालं आहे, कामाच्या व्यापामुळे तर कित्येकजणांना पुरेशी झोपही मिळत नाही.त्याचा सरळ परिणाम हा आरोग्यावर होताना दिसत आहे. मधुमेह ,हाय बीपी सारखे आजार त्यामुळे उध्दभवतात. सध्या हृदयावर ताण येऊन हृदयविकारचं प्रमाण खूप वाढले आहे. त्यामध्ये स्त्रियांपेक्षा पुरुषांमध्ये याचं प्रमाण वाढलेलं बघायला मिळत आहे.
पुरुषांमध्ये हृदयविकाराचा धोका जास्त असण्याची कारणे
पुरुषांच्या तुलनेत जर बघायला गेलं तर स्त्रियांच्या शरीराची हालचाल जास्त असते.मग ती वर्किंग वूमन असो किंवा हाऊसवाईफ. पुरुषांच्या शरीराची हालचाल स्त्रियांच्या तुलनेत कमी बघायला मिळते. सतत लॅपटॉपवरती काम करताना असताना दीर्घकाळ एकाच ठिकाणी बसून राहणे ,तेलकट पदार्थांचे सतत सेवन करणे, अपुरी झोप यामुळे जीवनशैली विस्कळीत होते.तसेच लवकर ताण येणं,मद्यपान करणं ही प्रमुख कारणे आहेत.
पुरुष आणि स्त्रिया यांच्यामध्ये येणाऱ्या हृदयविकाराची लक्षणं सुद्धा वेगवेगळी असतात.पुरुषाला जर हृदयविकाराचा झटका येत असेल तर छातीत दुखणे,हात दुखणे,पाठीत मुंग्या येणे ही लक्षणं प्रामुख्याने असतात तर स्त्रियांमध्ये अस्वस्थ वाटणे,छाती गच्च होणे,मळमळ होणे ही लक्षणं दिसून येतात.
हृदयविकाराचा धोका टाळण्यासाठी अशी घ्या काळजी
कुठल्याही गोष्टींचं नियोजन असणे खुप गरजेचे असते.आपली दैनंदिन कामं करत असतानाच आरोग्याकडे दुर्लक्ष होऊ देऊ नये.असे म्हणतात की,आरोग्य ही यशाची गुरुकिल्ली असते.आपले आरोग्य जर चांगले असेल तर कुठलेही काम आपण पार पाडू शकतो. त्यामुळे आरोग्य चांगले ठेवायचे असेल तर नियमित व्यायाम खुप महत्वाचा आहे. चालणे किंवा सायकय चालवणे हा खुप चांगला आणि सोपा व्यायाम आहे.नियमित प्राणायाम करणे सुद्धा आरोग्यसाठी खुप चांगले आहे.प्राणायाम केल्याने एकाग्रता वाढते तसेच मन शांत राहते.त्यामुळे ताण कमी येतो व हृदयविकाराचा धोका कमी होतो. व्यायामासोबतच योग्य आहाराचे सेवन करणे खुप गरजेचे आहे.तेलकट पदार्थाचे सेवन टाळावे. फास्टफूड टाळावे,कोल्डड्रींक्स चे कमी प्रमाणात सेवन करावे.धूम्रपान करणे टाळावे. धूम्रपानामुळे हृदयाला होणाऱ्या ऑक्सिजन पुरवठ्यावर परिणाम होतो. रक्ताच्या गाठी होऊन हृदयाला रक्त पुरवठा नीट होत नाही व त्यामुळे हृदयविकाराचा धोका निर्माण होऊ शकतो. या सर्व गोष्टींचे पालन करून आपली काळजी घेतली पाहिजे.