आदिपुरुष चित्रपटावरून उफाळून आलेला वाद थांबायचं नाव घेत नाही. त्यामुळे चित्रपट आणि वाद हे जुनं नातं वारंवार (History Of Indian Controversial Movie) अधोरेखित होताना दिसत आहे. कथानक, दृश्य, पात्र, संवाद, ऐतिहासिक संदर्भ एवढंच काय तर चित्रपटाला दिलेल्या नावावरून अनेकदा वाद होतात. गेल्या काही वर्षात अनेक चित्रपटांवर बॉयकॉट मोहिमांपासून ते कोर्टाची पायरी चढण्याची वेळ आली आहे. पण असे वाद आताच होत आहेत असं नाही तर वादाचं हे नातं 110 वर्ष जुनं आहे. सुरुवातीच्या काळात कोणत्या चित्रपटावरून (History Of Indian Controversial Movie) वाद झाले चला पाहूयात…
बॉलिवूड चित्रपटांवरुन वाद होण्याची ही पहिलीच घटना नाही. विशेष म्हणजे 1913 मध्ये बनलेल्या ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाला भारतातील पहिला चित्रपट होण्याचा मान मिळाला आहे, मात्र 100 वर्षांनंतर 2013 मध्ये या दाव्याला न्यायालयात आव्हान देण्यात आले होते. 1912 चा ‘श्री पुंडलिक’ हा मराठी चित्रपट पहिला चित्रपट असल्याच्या दावा करण्यात आला होता, मात्र कोर्टात ‘राजा हरिश्चंद्र’ या चित्रपटाचा विजय झाला होता.
1933 मध्ये देविका राणी आणि हिमांशू राय यांच्या ‘कर्मा’मधील 4 मिनिटांच्या चुंबनाच्या दृश्यामुळे इतका गोंधळ उडाला की, चित्रपटाला चांगलाच फटका बसला.1947 मधील दिलीप कुमार यांचा ‘जुगनू’ हा पहिला चित्रपट होता ज्यावर धार्मिक भावना दुखावल्याचा आरोप झाला होता, मात्र वादात अडकूनदेखील हा चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. म्हणजे सुरुवातीपासूनच जे चित्रपट वादात अडकतात ते बॉक्स ऑफिसवर मात्र चांगले चालतात हा ट्रेंड आहेच. कधी आणीबाणी, कधी अंडरवर्ल्ड, तर कधी भारत-पाकिस्तान तणाव, चित्रपटांशी संबंधित वाद जुनेच आहेत. वादांमुळे कधी चित्रपट हिट झाले, कधी फ्लॉप तर कधी चित्रपटांवर बंदी आली. वादामुळे अनेक स्टार्सचे करिअरही उद्धवस्त झाले.जुन्या चित्रपटांचे वाद काय होते चला पाहुयात…
1. भारतातील पहिला चित्रपट हिंदी की मराठी
भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासानुसार, पहिला पूर्ण लांबीचा फीचर चित्रपट म्हणजे दादासाहेब फाळके यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा आहे. हा चित्रपट 1913 मध्ये प्रदर्शित झाला असे म्हटले जाते. मात्र, त्याआधी दादासाहेब तोरणे यांचा ‘श्री पुंडलिक’ हा मराठी भाषेतील चित्रपट 1912 मध्ये प्रदर्शित झाला होता. 2013 मध्ये, राजा हरिश्चंद्र या चित्रपटाच्या रिलीजला 100 वर्षे पूर्ण झाल्यानंतर तोरणे यांच्या कुटुंबाने मुंबई उच्च न्यायालयात दावा दाखल केला होता की, भारतातील पहिल्या चित्रपटाचे श्रेय ‘राजा हरिश्चंद्र’ला नाही तर ‘श्री पुंडलिक’ या चित्रपटाला देण्यात यावे, परंतु तज्ज्ञांनी ते नाकारले. प्रदर्शनाच्या तारखेनुसार, मराठी चित्रपट ‘श्री पुंडलिक’ हा पहिला चित्रपट असणार होता, परंतु चित्रपट तज्ञांचे मत होते की हा खरा भारतीय चित्रपट असू शकत नाही कारण तो रंगमंच नाटक रेकॉर्ड करून बनविला गेला होता, तर त्याचा कॅमेरामन देखील भारतीय नव्हता. दादासाहेब फाळके भारतीय असल्याने आणि त्यांचा ‘राजा हरिश्चंद्र’ हा चित्रपट अखिल भारतीय कलाकारांसह भारतात बनवला गेला होता, तो पहिला भारतीय चित्रपट म्हणून घोषित करण्यात आला.
2. ब्रिटीश सेन्सॉर बोर्डाने बंदी घातलेला ‘भक्त विदुर’
1921 मध्ये ‘भक्त विदुर’ हा चित्रपट तयार झाला तेव्हा ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने त्याच्या प्रदर्शनावर बंदी घातली. भारतात बंदी घातलेला हा पहिला भारतीय चित्रपट आहे. चित्रपटात दिसलेले ‘विदुर’चे पात्र महात्मा गांधींसारखे होते, ज्यावर ब्रिटिश सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता. जालियनवाला बाग हत्याकांड आणि रौलेट कायद्यानंतर हा चित्रपट प्रदर्शित झाला होता. अशा परिस्थितीत चित्रपटाच्या माध्यमातून गांधींसारखे सरकारविरोधी पात्र दाखवण्यावर सेन्सॉर बोर्डाने आक्षेप घेतला होता.
3. हिंदी सिनेमातील 4 मिनिटांचा किसींग सीन
1933 साली आलेल्या ‘कर्मा’ या चित्रपटात भारतीय चित्रपटसृष्टीतील पहिली स्टार अभिनेत्री देविका राणी आणि त्यांचे पती हिमांशू यांनी मुख्य भूमिका साकारल्या होत्या.चित्रपटात देविका आणि हिमांशू यांचा 4 मिनिटांचा किसिंग सीन होता. स्क्रीनवर पहिल्यांदाच किसिंग सीन दाखवण्यात आला, तोही 4 मिनिटांसाठी. या दृश्यावर मोठ्या प्रमाणावर टीका झाली आणि वाद सुरू झाला.वास्तविक, हा एक इंग्रजी आणि हिंदी चित्रपट होता, ज्याचा प्रीमियर लंडनमध्ये झाला होता. लंडनमध्ये देविका यांच्या अभिनयाची बरीच चर्चा झाली होती, पण जेव्हा ‘कर्मा’ भारतात ‘नागिन की रागिनी’ म्हणून प्रदर्शित झाला तेव्हा लोकांनी देविकाला खूप विरोध केला. इंग्रजी संवाद असलेला हा पहिला भारतीय चित्रपट होता. या चित्रपटाच्या नावावर आजही सर्वात लांब ऑनस्क्रीन किस करण्याचा विक्रम आहे.
4. हिंदू-मुस्लिम वाद
23 मे 1947 रोजी दिलीप कुमार आणि नूर जहाँ यांचा ‘जुगनू’ हा चित्रपट प्रदर्शित झाला. हा चित्रपट कॉलेजच्या प्रेमकथेवर आधारित होता. चित्रपटाला विरोध करण्यामागे दोन कारणे होती, एक म्हणजे यात विद्यार्थ्यांमध्ये भरपूर रोमान्स दाखवण्यात आला होता आणि दुसरे म्हणजे चित्रपटाचे दिग्दर्शक शौकत हुसेन रिझवी भारत-पाकिस्तान फाळणीनंतर पाकिस्तानात स्थायिक झाले होते.
5. आणीबाणी काळ आणि चित्रपटांवर बंदी
25 जून 1975 रोजी आणीबाणी लागू झाल्याचा थेट परिणाम बॉलिवूडवर झाला आणि इंडस्ट्रीने हा दिवस काळा दिवस म्हणून घोषित केला. चित्रपट आणि माध्यमांपासून सर्व प्रकारचे स्वातंत्र्य हिरावून घेतले गेले. अनेक चित्रपटांवर बंदी घालण्यात आली. चित्रपटांमध्ये सरकारचा हस्तक्षेप वाढू लागला, तर अनेक चित्रपटांच्या प्रिंट्स जाळल्या गेल्या आणि अनेक चित्रपटगृहेही आणीबाणीच्या आगीत जळून खाक झाली. शोले चित्रपटाचे दिग्दर्शक रमेश सिप्पी यांनी अनेक प्रसंगी सांगितले की, सरकारच्या हस्तक्षेपामुळे त्यांना शोलेचा क्लायमॅक्स बदलावा लागला होता.
6. ‘आंधी’ या चित्रपटावर बंदी घालण्यात आली
आणीबाणीच्या काळात संजीव कुमार आणि सुचित्रा सेन यांच्या ‘आंधी’ या चित्रपटावर बंदी घालण्यात आली होती. त्यावेळी सत्तेत असलेल्या इंदिरा गांधींवर हा चित्रपट बनवण्यात आला होता. 1977 मध्ये गांधी सरकार पडल्यावर चित्रपटावरील बंदी उठवण्यात आली.
7.’किस्सा कुर्सी का’ या चित्रपटावर आणीबाणीच्या काळात बंदी
‘किस्सा कुर्सी का’ या चित्रपटावर आणीबाणीच्या काळात बंदी घालण्यात आली होती. जेव्हा हा चित्रपट सेन्सॉर बोर्डाकडे पाठवण्यात आला तेव्हा संजय गांधी यांच्या समर्थकांनी चित्रपटाच्या सर्व प्रिंट्स पेटवून दिल्या. चित्रपटात संजय गांधींच्या ऑटो मॅन्युफॅक्चरिंगची खिल्ली उडवण्यात आल्याचे कारण दिले गेले. आणीबाणीच्या काळात संजय गांधी यांची प्रतिमा सुधारण्यासाठी अनेक मोहिमा राबवण्यात आल्या. दरम्यान, किशोर कुमार यांना 20 कलमी कार्यक्रमासाठी संजय गांधींच्या गौरवात गाण्यासाठी बोलावण्यात आले, परंतु त्यांनी गाण्यास नकार दिला. त्यामुळे संतप्त झालेल्या काँग्रेसने किशोर कुमार यांच्या गाण्यांवर बंदी घातली होती. आणीबाणीला विरोध केल्यामुळे मनोज कुमार यांचा ‘दौर’ हा चित्रपट प्रदर्शित होण्यापासून रोखण्यात आला होता.
हल्ली कोणताही चित्रपट प्रदर्शित (History Of Indian Controversial Movie) होत असताना आता कोणता नवा वाद उफाळून येणार हाच प्रश्न पडतो. कारण हल्ली एकही चित्रपट हा वादाशिवाय चालतच नाही. सध्या वादाच्या पडद्यावर ट्रोलिंगचा पिक्चर पाहायला मिळत आहे.