पुणे- स्वभाव जुळत नसल्याने एकमेकांपासून दीड वर्ष वेगळे राहणाऱ्या दांपत्याला केवळ ९ दिवसात घटस्फोट मिळाला. परस्पर संमतीने दोघेही घटस्फोट घेण्यास तयार असल्यामुळे दोघेही स्वतंत्रपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.
पुण्यात राहणाऱ्या या दांपत्याचे लग्न २०२० मध्ये झाले. त्यांना मुलबाळ नाही. दोघेही उच्च शिक्षित असल्यामुळे कमावते आहेत. काही दिवसांच्या सहजीवनानंतर दोघांच्या स्वभावातील तफावतीमुळे दोघांनीही वेगळे राहण्याचा निर्णय घेतला. तब्बल दीड वर्षे वेगळे राहिल्यानंतर त्यांनी परस्पर संमतीने घटस्फोट घेण्याचा निर्णय घेतला.
दोघांनी ऍड. विजयकुमार बिराजदार, ऍड . ऋषिकेश खंडेलवाल, ऍड . नंदकिशोर येरंडे आणि ऍड. हर्ष खंडेलवाल यांच्यामार्फत कौटुंबिक न्यायालयात परस्पर संमतीने घटस्फोटासाठी अर्ज दाखल केला. सर्वोच्च न्यायालयाच्या न्याय निवाड्यानुसार परस्पर संमतीने घटस्फोटाचा दावा दाखल करण्यापूर्वी दोघे 18 महिने वेगळे राहत असल्यास सहा महिन्यांचा कालावधी वगळता येतो. या निर्णयाचा आधार घेत कौटुंबिक न्यायालयाचे प्रमुख न्यायाधीश सुभाष काफरे यांनी अवघ्या 9 दिवसांत घटस्फोट मंजूर केला.
या निर्णयामुळे दोघांच्या वेळेची बचत झाली आहे . ते स्वतंत्रपणे आयुष्य जगण्यास मोकळे झाले आहेत.