Edited by: Bageshree Parnerkar ज्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने भारतावर सुमारे दीडशे वर्षे राज्य केलं, देशाला गुलामगिरीच्या खाईत लोटल, देशातील जनतेवर अनन्वित अत्याचार केले, त्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीवर आज भारतीयांची राजवट आहे. एका भारतीय उद्योगपतीने या कंपनीची मालकी मिळवलेली आहे. यानिमित्ताने या कंपनीचा रंजक इतिहास जाणून घेऊयात
ज्या कंपनीने एकेकाळी जवळपास निम्म्या जगावर अधिराज्य गाजवल त्या कंपनीची स्थापना व्हायला मसाल्याच्या किमतीतील दरवाढ कारणीभूत ठरली. 16 व्या शतकात युरोपातील बाजारपेठांवर स्पेन आणि पोर्तुगालचे वर्चस्व होते. त्या काळात डच आणि पोर्तुगीजांनी मसाल्यातील मिऱ्याचे दर पाच शिलिंग म्हणजे आताच्या भारतीय चलनाच्या तुलनेत 10 रुपये इतक्या रकमेने वाढवले. त्यामुळे ब्रिटीश ग्राहकांमध्ये संतापाची लाट उसळली. कारण त्यावेळी ब्रिटिश लोकांच्या आहारात मसाल्याच्या पदार्थांचे महत्त्व अनन्यसाधारण होते. त्यामुळे स्पेन आणि पोर्तुगीजांना व्यापारीदृष्ट्या शह देण्यासाठी ब्रिटिशांनी या व्यापारात उतरावे असा मतप्रवाह पुढे आला.
त्यानंतर लंडनमधील 24 व्यापाऱ्यांनी एकत्र येऊन 24 सप्टेंबर 1599 रोजी द ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीची स्थापना केली. 31 डिसेंबर 1599 रोजी पहिल्या व्हिक्टोरिया राणीने या कंपनीला मान्यता दिली आणि कंपनी जगभरातील व्यापारासाठी बाहेर पडली. ऑगस्ट 1608 मध्ये या कंपनीचे दमनकारी पाय भारतातील सुरत शहराला लागले आणि भारताच्या अधोगतीला सुरुवात झाली.
2005 साली संजीव मेहता यांनी पुन्हा एकदा नव्याने बाजारात आलेल्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीचे बहुतांश शेअर्स कंपनीच्या 30 ते 40 भागधारकांकडून 120 कोटी रुपयांमध्ये खरेदी केले
या कंपनीच्या माध्यमातून आजकाल जगातील काही प्रमुख देशांमध्ये चहा, कॉफी आणि चॉकलेटसारख्या पदार्थांचे ऑनलाइन मार्केटिंग केले जाते
ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रज राजवटीने भारतात जाणीवपूर्वक घडवून आणलेला रक्तपात हा जगाच्या ज्ञात इतिहासातील सर्वात रक्तरंजित इतिहास आहे. इंग्रजांच्या या अत्याचारामुळे जवळपास 3.5 कोटी भारतीयांना आपला जीव गमवावा लागला. दुष्काळ, साथीचे आजार, जातीय दंगे, जालियनवाला बागेसारख्या सार्वजनिक कत्तली, 1857 च्या स्वातंत्र्यलढ्यात इंग्रजांनी मारलेले स्वातंत्र्यसैनिक यांचा या हत्याकांडात समावेश होतो. ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनी आणि इंग्रज राजवटी भारतात येण्यापूर्वी जागतिक बाजारपेठेत भारतीय व्यापाराचे प्रमाण जगात सर्वाधिक म्हणजे जवळपास 23% होते. पण इंग्रज भारतातून जाताना जागतिक व्यापारातील हाच वाटा केवळ 4% उरला होता. यावरून ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने किती बेसुमार लूट केली याचा अंदाज येतो.
ज्या ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीने तमाम भारतीयांना एकेकाळी गुलामगिरीत लोटले होते तीच कंपनी आज एका भारतीय उद्योजकाच्या हाताखाली नांदते आहे. भारतीयांच्या दृष्टीने ही अतिशय अभिमानास्पद बाब आहे.