नवी दिल्ली- रशिया युक्रेनमध्ये सध्या युद्ध सुरु आहे. अशा युद्ध परिस्थितीमध्ये युक्रेनमध्ये अनेक भारतीय नागरिक अडकलेले आहेत. त्यामुळे या नागरिकांना मायदेशी आणण्यासाठी केंद्र सरकारने महत्वाचे पाऊल उचलले आहे. युक्रेनमध्ये अडकलेले 242 भारतीय त्यांच्या देशात परतले आहेत. यापैकी बहुतेक जण युक्रेनमध्ये मेडिकलचे शिक्षण घेणारे विद्यार्थी आहेत.
युक्रेनमधून भारतात परतलेल्या एका विद्यार्थ्याने दिल्ली विमानतळावर सांगितले की, “काल रात्री आम्हाला युक्रेनमध्ये 30 दिवसांच्या आपत्कालीन परिस्थितीची बातमी मिळाली आणि त्यानंतर आम्ही घरी परतलो. तर एमबीबीएसच्या एका विद्यार्थ्याने सांगितले की, “मी जिथे राहत होतो, तिथे परिस्थिती ठीक आहे. कारण हे ठिकाण सीमेपासून खूप दूर आहे. पण आमच्या दूतावासाने आम्हाला मायदेशी परतण्यास सांगितले, अॅडव्हायझरी दिल्यानंतर मी परत आलो.” युक्रेनमधून परतलेल्या अनेक भारतीय विद्यार्थ्यांचे फोटो समोर आले आहेत. विद्यार्थ्यांना पाहून त्यांचे पालक भावूक झाल्याचे दिसले आणि त्यांनी सुटकेचा नि:श्वास सोडला.
युक्रेनवरील हल्ल्यावर भारताची प्रतिक्रिया
रशियाने क्रेनवर केलेल्या हल्ल्यानंतर भारताने पुन्हा एकदा रशिया आणि युक्रेन या दोन्ही देशांना संयम बाळगण्याचे आवाहन केले आहे. त्याचबरोबर दोन्ही देशांनी चर्चेतून समस्येवर तोडगा काढावा, असेही सांगण्यात आले. भारताने बदललेल्या घडामोडींना संपूर्ण प्रदेशातील शांतता आणि सुरक्षेसाठी धोका असल्याचे म्हटले आहे.