भुवनेश्वर : ओडिशाच्या बालासोर जिल्ह्यामध्ये शुक्रवारी झालेल्या ट्रेनच्या भीषण अपघाताने (Odisha Train Accident) संपूर्ण देशाला हादरवून सोडले होते. या अपघातात 280 पेक्षा जास्त जणांचा मृत्यू झाला होता. या अपघातात मृत्यू पावलेल्या कुटुंबाला राज्य सरकार आणि केंद्र सरकारकडून मदत करण्यात येत आहे. मात्र आता एक अशी घटना समोर आली आहे. यामध्ये मदतीची रक्कम मिळण्यासाठी एका महिलेने आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा खोटा दावा केला. हा प्रकार तिच्या नवऱ्याला समजताच त्याने तिच्याविरोधात तक्रार (FIR) दाखल केली आहे. याची माहिती मिळताच महिला फरार झाली आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
कटक जिल्ह्याच्या मणियाबांदाची (Maniabanda) निवासी गितांजली दत्ताने (Gitanjali Dutta) 2 जूनच्या रेल्वे अपघातामध्ये आपल्या पतीचा मृत्यू झाल्याचा दावा केला. एवढच नाही तर तिने एका मृतदेहाची ओळख पटवून हाच आपला पती असल्याचं सांगितले. प्रशासनाने कागदपत्र तपासली असता महिलेचा दावा खोटा असल्याचे समोर आले. यानंतर पोलिसांनी या महिलेला इशारा देऊन सोडून दिलं, पण पतीने तिची तक्रार केल्यामुळे तिच्या अडचणींमध्ये वाढ झाली आहे
याप्रकरणी महिलेचा पती बिजय दत्ता (Bijay Dutta) यांनी मणियाबांदा पोलीस स्टेशनमध्ये (MANIABANDA POLICE STATION) तक्रार दाखल केली आहे. आपल्यावर तक्रार दाखल झाल्याचे समजताच ही महिला फरार झाली आहे. सर्वात धक्कादायक म्हणजे मागच्या 13 वर्षांपासून ही महिला पतीपासून वेगळी राहत आहे.