नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारतीय आयुर्विमा म्हणजेच एलआयसीने (LIC) शनिवारी रात्री सांगितले की, ओडिशाच्या बालासोर येथे शुक्रवारी संध्याकाळी झालेल्या दुःखद रेल्वे दुर्घटनेत बाधित झालेल्यांना आर्थिक दिलासा देण्यासाठी क्लेम सेटलमेंटला गती आणली जाईल. दावेदारांपर्यंत पोहोचण्यासाठी आणि पीडित कुटुंबांचे दावे लवकरात लवकर निकाली काढण्यासाठी सर्व प्रयत्न केले जातील, असे एलआयसीकडून सांगण्यात आले आहे.
तसेच एलआयसी पॉलिसी आणि प्रधानमंत्री जीवन ज्योती विमा योजनेच्या दावेदारांच्या अडचणी कमी करण्यासाठी कॉर्पोरेशनने अनेक सवलती जाहीर केल्या आहेत. यामध्ये त्यांनी नोंदणीकृत मृत्यू प्रमाणपत्रांच्या बदल्यात, रेल्वे, पोलीस किंवा कोणत्याही राज्य किंवा केंद्र प्राधिकरणाने प्रकाशित केलेल्या मृतांची यादी मृत्यूचा पुरावा म्हणून स्वीकारली जाईल असेदेखील म्हंटले आहे.
काय घडले नेमके?
ओडिशातील बलसोरपासून सुमारे 40 किमी अंतरावर या ट्रेनची मालगाडीसोबत टक्कर झाल्याचे सांगण्यात येत आहे. अपघातात ट्रेनचे काही डब्बे रुळावरुन घसरले आहेत. या घटनेत 900 प्रवासी जखमी झाले आहेत तर 200 हुन अधिक जणांचा मृत्यू झाला आहे. कोरोमंडल एक्सप्रेस आणि मालगाडी एकाच मार्गावर आल्याने हा अपघात झाला होता.