कोहिनूर हिऱ्याबद्दल सगळ्यांनाच माहिती आहे. कोहिनूर हिरा जेवढा मौल्यवान आणि अद्वितीय आहे तेवढाच तो वादग्रस्तही राहिला आहे. कोहिनूर हा मौल्यवान हिरा एकेकाळी भारताचा होता. त्यामुळे तो भारताला मिळावा म्हणून वारंवार मागणी केली जाते. अशात आता कोहिनूर हिरा लुटल्याचं ब्रिटनने मान्य केले आहे. तसेच भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोहिनूर हिरा आणि अनेक वस्तू ब्रिटनकडून परत मिळवण्यासाठी स्वतःलाच वचन दिल्याचे समोर आले आहे.
काय आहे नेमके प्रकरण?
ब्रिटनच्या टॉवर ऑफ लंडनमध्ये सध्या राजघराण्याशी संबंधित प्रदर्शन सुरु आहे. प्रदर्शनात मांडण्यात आलेल्या कोहिनूर हिऱ्याबद्दलच्या माहितीत पंजाबचे तत्कालीन महाराज दिलीप सिंग यांना इस्ट इंडिया कंपनीनं कोहिनूर हिरा देण्यास भाग पाडले होते. या घटनेच्या वेळी त्यांचं वय 10 वर्षं होते असं त्यात नमूद करण्यात आले आहे. विशेष म्हणजे हा मजकूर बकींगहॅम पॅलेस रॉयल कलेक्शन ट्रस्टच्या मान्यतेनंतर प्रदर्शनात मांडला गेला आहे. दुसरीकडे वसाहतवादी काळात तत्कालीन ब्रिटिशांनी भरतातून लुटलेल्या कोहिनूरसह अन्य मौल्यवान आणि प्रतीकात्मक चीजवस्तू पूर्ववत ताब्यात मिळाव्यात म्हणून मोदी सरकारनं हालचाली सुरु केल्या आहेत.
महाराजा दिलीप सिंग यांनी ब्रिटिश ईस्ट इंडिया कंपनीला कोहिनूर दिला तेव्हा त्यांच्या मातोश्री कंपनीकडे कैद होत्या.1849 मध्ये इंग्रजांनी दिलीप सिंग यांच्याकडून पंजाबातील लाहोर म्हणजेच सध्याचा पाकिस्तान याला ताब्यात घेतलं होते. लाहोर करारानुसार दिलीप सिंग यांनी कोहिनूर हिरा कंपनीच्या सुपूर्द करावा यासाठी अशी अट घालण्यात आली होती. अर्थातचं आई सुरक्षित हवी असेल तर…. कोहिनूरवरील एक लघुपटही प्रदर्शनात दाखवण्यात आला.