नवी दिल्ली : वृत्तसंस्था – बोगस मतदान (Bogus voting) रोखण्यासाठी निवडणूक आयोगाकडून (Election Commission) एक नवीन शक्कल लढवण्यात येणार आहे. मतदान केल्यानंतर आपल्या बोटावर शाईने (ink) खूण केली जाते. त्यामुळे ही शाई पुसून लोक बोगस मतदान करत होते. यावर आता निवडणूक आयोगाकडून एक पर्याय शोधण्यात आला आहे. मतदान केल्यानंतर बोटावर शाईने खूण करण्याऐवजी लेझरने (laser) खूण केली जाणार आहे. त्यामुळे लोकांना लेझरने केलेली खूण लगेच पुसणे शक्य होणार नाही. ही खूण अनेक दिवस बोटावर राहील, असा दावा निवडणूक आयोगाकडून करण्यात आला आहे.
याच वर्षी पाच राज्यांत होणाऱ्या विधानसभा निवडणुकीपासून हे आमलात आणले जाऊ शकते. सध्या याची चाचणी सुरु आहे. या लेझर तंत्रज्ञानामुळे मतदान प्रक्रियेतील हेराफेरी रोखता येईल, असा निवडणूक आयोगाला विश्वास आहे. याचबरोबर ईव्हीएममध्ये (EVM) कॅमेराही बसवला जाणार आहे. हा कॅमेरा मतदान करत असताना मतदाराचा फोटो टिपणार आहे. त्या माध्यमातूनही बोगस मतदान रोखले जाणार आहे. सदर व्यक्ती दुसऱ्यांदा मतदान करण्याचा प्रयत्न करत असेल तर एआय तंत्रज्ञानाने त्याला ओळखून तसा अलर्ट निवडणूक अधिकाऱ्याला देण्यात येणार आहे.