नवी दिल्ली : वृत्तसंस्था – भारताने आज एक मोठा इतिहास रचला आहे. इस्रोचं चांद्रयान-3 (Chandrayaan-3) चंद्रावर यशस्वीपणे लँड झालं आहे. या लँडिंगसह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर उतरणारा भारत हा पहिला देश ठरला आहे. संपूर्ण जगाचं लक्ष भारताच्या या मोहिमेकडे लागून राहिले होते. इस्रोच्या चांद्रयान 3 मोहिमेच्या (ISRO Moon Mission) निमित्तानं पृथ्वीवरील पहिलाच कृत्रिम उपग्रह चंद्राच्या दक्षिण ध्रुवावर पोहोचण्याची किमया घडली आहे. अमेरिका, चीन आणि पूर्व सोवियत संघामागोमाग चंद्रावर जाणारा भारत चौथा देश ठरला आहे.
आतापर्यंतच्या भारताच्या चांद्रयान मोहीमा
चांद्रयान-1
28 ऑगस्ट 2008 रोजी मोहीम सुरु झाली.
12 नोव्हेंबर 2008 रोजी ऑर्बिटर चंद्राच्या कक्षेत दाखल झालं.
सुमारे 77 दिवसांचा कालावधी लागला.
चांद्रयान-2
त्यानंतर 22 जुलै 2019 चांद्रयान-2 मोहीम सुरु झाली.
6 सप्टेंबर 2019 रोजी विक्रम लँडर वेगळा होऊन चंद्रावर लँड होण्यासाठी सज्ज झाला.
चांद्रयान-2 मोहिमेला 48 दिवस लागले होते. पण, नंतर त्याचा संपर्क तुटला आणि ही मोहिम अयशस्वी ठरली.
आतापर्यंत ‘या’ देशांनी चंद्रावर जाण्याचा केला प्रयत्न
1998 ते 2023 दरम्यान भारत, अमेरिका, रशिया, जपान, यूरोपीय संघ, चीन आणि इस्त्रायलने चांद्र मोहिमा केल्या. यात इम्पॅक्टर, ऑर्बिटर, लँडर-रोव्हर आणि फ्लायबाय मशीन्स होते. यूरोपचं स्मार्ट-1, जपानचं सेलेन, चीनचं चांगई-1, भारताचं चांद्रयान-1 अमेरिकेच्या लूनर रीकॉनसेंस ऑर्बिटर मिशन यांचा यात समावेश आहे.