यवतमाळ : यवतमाळ जिल्ह्यात डेंग्यूच्या (Dengue) संक्रमनाने थैमान घातले असून अनेक नागरिक आजाराने त्रस्त आहेत. जिल्ह्यात अनेकांना डेंग्यूची लागण झाली असून या आजाराने अनेकांना आपला जीव गमवावा लागला आहे. याच दरम्यान आता यवतमाळ जिल्ह्यातील नेर-आर्णी मध्ये डेंग्यूच्या आजाराने तीन जणांचा मृत्यू झाला आहे. एकाच दिवशी तीन जणांचा बळी गेल्याने मोठी खळबळ उडाली आहे.
साहिल खांडेकर, कर्तव्य झांबरे (दोघेही रा. नेर) तर जागृती चव्हाण (रा. मालेगाव, आर्णी तालुका) अशी डेंग्यूने मृत्यूमुखी पडलेल्या लहान मुलांची नावे आहेत. यवतमाळ जिल्ह्यात गेल्या काही दिवसांपासून डेंग्यूची साथ सुरु आहे. अजूनही हे संक्रमण आटोक्यात आलेले नाही. यवतमाळ, महागाव, मारेगाव या तालुक्यात आतापर्यंत डेंग्यूने अनेक लहान मुलांचा बळी घेतला आहे. या घटनेमुळे आपली आरोग्य यंत्रणा खडबडून जागी झाली आहे.