वर्धा : जे लोक आपल्या आयुष्याला वैतागलेले असतात (Wardha News) ते लोक कधीकधी हे देवा एकदाचं मरण येऊन दे, सगळ्याच कटकटीतून सुटका होईल असे सहज बोलून जातात. आपल्याला मरण आलं कि सगळ्याच अडचणीतून कायमची सुटका असंच वाटतं. पण वर्ध्यात (Wardha News) एका ठिकाणी भयानक चित्र पाहायला मिळाले आहे. इथं मृत्यूनंतर हाल संपले नाहीत. जिवंतपणीच नव्हे तर मृत्यूनंतही एका समस्येचा सामना करावा लागतो आहे.या ठिकाणी मृतदेहालाही खडतर प्रवास करावा लागतो आहे. या भयानक वास्तवाचा एक काळजी पिळवटून टाकणारा व्हिडिओ व्हायरल होत आहे.
काय आहे व्हिडिओमध्ये?
हिंगणघाट तालुक्यातील खैराटी गावातील ग्रामस्थांची एक समस्या ज्याचा सामना त्यांना जिवंतपणीच नव्हे तर मृत्यूनंतरही करावा लागतो आहे. मन हेलावणारा असा हा व्हिडीओ आहे. जो पाहून तुम्हालादेखील संताप आल्याशिवाय राहणार नाही. या व्हिडीओत तुम्ही पाहू शकता एक अॅम्ब्युलन्स दिसते आहे. अॅम्ब्युलन्समधून काही लोक मृतदेह बाहेर काढतात आणि तो एका बैलगाडीत ठेवतात. आता अॅम्ब्लुलन्स असताना या मृतदेहाला बैलगाडीतून नेण्याची वेळ ओढावली आहे. याचं कारण म्हणजे या गावात रस्ताच नाही.
मृत्यूनंतरही मरणयातना ! मृतदेहाचा बैलगाडीतुन खडतर प्रवास; काळीज हेलावून टाकणारा व्हिडिओ आला समोर pic.twitter.com/w1I6AayC68
— TOP NEWS MARATHI (@Topnewsmarathi) August 27, 2023
कुठला आहे हा धक्कादायक प्रकार?
वाघोली ग्रामपंचायतअंतर्गत येणाऱ्या खैराटी इथल्या पारधी बेड्यावरील हे दृश्य आहे. इथं पक्का रस्ता नाही त्यामुळे नागरिकांना अशी कसरत करावी लागते. रस्त्याअभावीच या व्यक्तीचा मृत्यू झाल्याचा आरोप त्याच्या कुटुंबाने केला आहे. रात्री या व्यक्तीला रुग्णालयात नेण्यात आलं पण रस्ता नसल्याने हॉस्पिटलमध्ये पोहोचण्यास उशीर झाला. त्यामुळेच आपल्या भावाचा मृत्यू झाला असा आरोप मृताच्या भावाने केला आहे. मृतदेह घरी आणतानाही तो रुग्णालयातून पारधी बेड्यावर आणला. पण पक्का रस्ता नसल्याने गाड्या जात नाहीत. त्यामुळे पारधी बेड्यावरून पुढे हा मृतदेह बैलगाडीतून नेण्यात आला.