मुंबई : शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘आवाज कुणाचा’ या ‘पॉडकास्ट’ माध्यमातून ‘सामना’ला आज मुलाखत (Uddhav Thackeray Interview) दिली. या मुलाखतीमध्ये उद्धव ठाकरे यांनी अनेक प्रश्नांची उत्तरे देताना राज्य आणि केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे. ‘‘2024 साल आपल्या देशाच्या आयुष्याला नवे वळण देईल.’’ असे उद्धव ठाकरे या मुलाखतीत म्हणाले आहेत. चला तर मग जाणून घेऊया या मुलाखतीतील महत्वाचे मुद्दे…
1) धनुष्यबाण की मशाल?
धनुष्यबाण आणि मशाल या नंतर आलेल्या गोष्टी. पहिली आली ती शिवसेना. ते नाव फार महत्त्वाचं आहे. हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुखांनीसुद्धा सांगितलेलं आहे की, शिवसेना हे नाव प्रबोधनकारांनी, माझ्या आजोबांनी दिलेलं आहे.
2) इर्शाळवाडी दुर्घटना लाजीरवाणी असं का म्हणालात?
मी लाजिरवाणं एवढय़ासाठी म्हटलं की, मी इर्शाळवाडीला गेलो असताना त्या गर्दीत एक तरुण मला ओरडून प्रश्न विचारत होता की, ‘आपल्या स्वातंत्र्याला पंचाहत्तर वर्षे झाली तरी आम्ही हेच आयुष्य जगायचं का?’ आणि हा चटका लावणारा प्रश्न आहे.
3) समृद्धीवर भीषण अपघातानंतर शपथविधी
समृद्धी महामार्गावर इतका मोठा अपघात झाला. त्या अपघातातील मृतांच्या चिता धगधगत असताना इथे शपथविधी झालाय. चितांचा धूर विझलेला नसताना मंत्रीपदाच्या शपथा घेतल्या जाता हा विषय खूप गंभीर आहे.
4) मोठी दुर्घटना घडली असताना मुख्यमंत्री दिल्ली दरबारी
एवढी मोठी दुर्घटना घडलेली असताना मुख्यमंत्री मुजरा मारायला दिल्ली दरबारी गेले आहेत. राज्यात एवढी मोठी दुर्घटना घडली आहे, आपत्ती ओढवली आहे, दरड कोसळली आहे तरीदेखील हे दिल्ली दरबारी मुजरा मारायला जाताहेत. हे असे हुजरे राज्याला काय न्याय देणार?
5) उद्धव ठाकरेंना सत्ता राबवताच आली नाही?
सध्याचं चित्र तुम्ही म्हणताय ते पाहिलं तर या पद्धतीने मी सत्ता राबवू इच्छित नाही आणि माझ्याकडून ती तशी राबवली पण जाणार नाही. जर मला सत्ता टिकवायची असती तर जे गद्दार होते ते गद्दारी करण्यापूर्वी माझ्यासोबतच दोन-तीन दिवस होते. त्यांना हॉटेलमध्ये किंवा इतरत्र डांबून ठेवू शकलो असतो, पण असं किती दिवस डांबून ठेवणार. जी मनानेच विकली गेली आहेत ती माणसं मला नकोच आहेत.
6) वर्षभराचा काळ कसा गेला
असंख्य लोक माझ्यासमोर आहेत. येताहेत. उदंड प्रतिसाद लाभतोय. शिवसेना मजबूत होतीच, पण आता अडीच वर्षात मी जे काही करू शकलो त्याच्यामुळे महाराष्ट्रातली जनता मला त्यांच्या कुटुंबातील सदस्य मानायला लागली. ही माझी कमाई आहे. मोठी कमाई आहे. त्या एका नात्याने शिवसेनेसोबत पूर्वी कधीही नव्हते असे लोकही, अशी जनताही शिवसेनेसोबत जोडली गेली.
7) उद्धव ठाकरे यांनी आमच्या पाठीत खंजीर खुपसला – देवेंद्र फडणवीस
ठीक आहे. मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं, की ज्यामुळे तुम्ही राष्ट्रवादी फोडलीत. शिवसेनेने खंजीर खुपसला, मी खंजीर खुपसला म्हणताय, मग राष्ट्रवादीने काय खुपसलं होतं की तुम्ही त्यांना पण फोडलंत? तुमचं सरकार आलं होतं ना, शिवसेना फोडून. शिवाय अपक्षही सोबत घेऊन तुमचं सरकार मजबूत झाल्यानंतरही पुन्हा राष्ट्रवादी का फोडलीत?
8) हे सरकार स्थिर आहे का?
स्थिर कोणत्या दृष्टीने. जर तुम्हाला बारीक सारीक गोष्टींसाठी दिल्लीत येरझारा घालाव्या लागत असतील तर इथे सरकार असले काय नसले काय? फरक काय पडतो? बरं, देशाची स्थिती काय आहे आज. डबल इंजिनचा बोजवारा उडाला आहे. दोन्ही इंजिन फेल गेलेत.
9) दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या वाढदिवशी, तुम्ही दोघांपैकी कोणाला शुभेच्छा दिल्या?
मी सकाळीच इर्शाळवाडीला गेलो. त्यामुळे त्यांना फोन करता आला नाही, पण शुभेच्छा देईनच आणि शुभेच्छा देताना हेच सांगेन की, या शुभेच्छा केवळ माझ्या नाहीत तर तमाम जनतेच्या म्हणून देतोय. त्या तुम्ही सत्कारणी लावा.
10) तुम्ही हिंदुत्वावर किती ठाम आहात!
पहिली गोष्ट, मी माझ्या हिंदुत्वाची एक चौकट, जी माझ्या वडिलांनी आणि आजोबांनी दिलेली आहे, ती चौकट मी सांगितलेली आहे. या देशावर जो प्रेम करतो, जो देशासाठी मरायला तयार आहे तो हिंदू आणि आमचे हिंदुत्व शेंडी-जानव्याचे किंवा देवळात घंटा बडवणाऱ्यांचे हिंदुत्व नाही.