मुंबई – शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे यांच्या बंडामुळे राज्याचं राजकारण ढवळून निघालं असून शिंदे यांच्यासोबत ४० हून अधिक आमदार असल्याने शिवसेनेला मोठा धक्का बसला आहे.
शिंदे बरोबर असणाऱ्या आमदारांमध्ये राज्याचे पाणीपुरवठा मंत्री गुलाबराव पाटील, उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत, फलोत्पादन मंत्री संदीपान भूमरे, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांच्यासह प्रहारचे आमदार आणि शिवसेनेला पाठिंबा देत राज्यमंत्री झालेल्या बच्चू कडू यांचा देखील समावेश आहे.
या बंडाच्या पार्श्वभूमीवर आता राज्याच्या राजकारणात मोठी घडामोड घडली असून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस हे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांची भेट घेतल्यांतर आता राज्यपालांनी 30 जून रोजी विशेष अधिवेशन बोलावले असून सकाळी 11 वाजता हे अधिवेशन सुरू होणार असल्याची माहिती समोर आली आहे. त्यामुळे आता या अधिवेशनात ठाकरे सरकारला बहुमत सिद्ध करावे लागणार असल्याची शक्यता आहे.
आता ठाकरे सरकार राहणार की पडणार याचा फैसला 30 जून रोजी होणार असून संपूर्ण राज्याचं लक्ष या विशेष अधिवेशनाकडे लागलं आहे.