बदलापूर : बदलापूरमधून (Badlapur News) एक आश्चर्यकारक बातमी समोर आली आहे. बदलापूर शहराच्या मध्यभागी वसलेलं छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या बाजूला असलेलं महापालिकेचं उद्यान.हे उद्यान चोरीला गेल्याची घटना समोर आली आहे. बदलापूरमधील एका गावामध्ये हा अचंबित करणारा प्रकार घडला आहे. परंतु हे उद्यान चक्क चोरीला गेल्याची तक्रार एका व्यक्तीने नगरपालिकेच्या कार्यालयात केली आहे.
या तक्रारीनंतर सर्वसामान्यांच्या सोयींच्या अभाव,प्रशासनाच्या कामकाजातील त्रूटी या व्यक्तीनं निदर्शनास आणण्याचं काम केलं आहे.याचा परिणाम स्थलांतरित नागरिकांच्या मानसिकतेवर होतोय.मनसेचे बदलापूर विभाग अध्यक्ष किरण भगत यांनी नगरपालिकेकडे याबद्दल तक्रार केली आहे. साधारणत 2005 साली छत्रपती शिवाजी महाराज मैदानाच्या बाजूला लहान मुलांना खेळण्यासाठी हे उद्यान बांधण्यात आले होते,असं स्थानिकांकडून सांगण्यात येत आहे. शिवाय या उद्यानाच्य़ा पुनर्बांधणीसाठी प्रस्ताव दिला असता या प्रस्तावाकडे नगरपालिकेने कानाडोळा केला.
एकेकाळी हिरवंगार नेहमी बहरलेलं,वयस्क नागरिकांच्या वावराने प्रफुल्लित करणारं हे उद्यान होतं.काळानुरुप वाढत्या शहरीकरणाच्या नादात प्रशासनाचं देखील या उद्यानाकडे दर्लक्ष झाले,आणि कालांतराने ते निस्तानाबुत झालं.शहराच्य़ा मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या उद्यानाच्य़ा मोकळ्या जागेवर फेरीवाले,टपरीवाल्यांचं अतिक्रमण वाढतयं.असे प्रकार होत राहिले तर लहान मुलांना खेळण्यासाठी हे उद्यान कायमचं बंद होईल .त्यामुळे प्रशासनाने या प्रकरणाकडे गांभीर्याने लक्ष द्यावे अशी मागणी किरण भगत यांच्याकडून करण्यात आली आहे.