मुंबई : शरद पवारांनी (Sharad Pawar) महाविकास आघाडी (Mahavikas Aghadi) एकसंध ठेवून लोकसभा आणि विधानसभेतील दुसऱ्या क्रमांकाच्या जागेवर लक्ष केंद्रित करण्याचे आदेश दिले. त्यातच आता लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याचा फॉर्मुला ठरल्याची घटना राजकीय वर्तुळात रंगली आहे. सुरुवातीला ठाकरे गटाकडून लोकसभेच्या वीस जागांवर दावा करण्यात आला होता. तर काँग्रेस आणि राष्ट्रवादीकडून (NCP) समान जागा वाटपाचा प्रस्ताव ठेवण्यात आला आहे.
यासंदर्भात मविआची एक बैठकही पार पडली आहे. या बैठकीमध्ये लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्यावर चर्चा करण्यात आली. लोकसभेसाठी समसमान 16-16-16 जागा लढविण्याच्या फॉर्म्युल्याबाबत काँग्रेस (Congress) पक्ष आग्रही आहे. मात्र ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी लोकसभेच्या जागावाटपाबाबत मोठा दावा केला आहे.
काय म्हणाले संजय राऊत ?
जागावाटपाबाबत अद्याप कोणताही फॉम्यूर्ला ठरलेला नाही. समान जागा वाटपाबाबतही काही ठरलेलं नाही. आम्ही 18 जागा लढवणार आहोत. आमचे 18 खासदार विजयी होतील. दादरा नगर हवेलीमधून देखील आमचा एक खासदार विजयी होईल. लोकसभेत आमचे 19 खासदार जातील असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.