शिर्डी : समृद्धी महामार्गाचे (Samruddhi Mahamarg) उद्घाटन झाल्यापासून या महामार्गावर अपघाताचे प्रमाण खूप वाढले आहे. हे अपघात रोखण्यासाठी आता सरकारने एक मोठे पाऊल उचलले आहे. आजपासून टायर तपासणी करूनच समृद्धी महामार्गावर वाहने सोडली जाणार आहेत. यासाठी शिर्डी इंटरचेंजवर वाहन तपासणी केंद्राचे उद्घाटन करण्यात आले आहे. ज्या वाहनांचा टायर खराब असेल त्या वाहनांना समृद्धी महामार्गावर प्रवेश देण्यात येणार नाही अशी माहिती परिवहन आयुक्त विवेक भिमनवार यांनी दिली आहे.
शिर्डीच्या (Shirdi) इंटरचेंजवर आज परिवहन आयुक्त विवेक भिमनवार (Transport Commissioner Vivek Bhimanwar) यांच्या हस्ते तपासणी केंद्राचे उद्घाटन झाले. टायर तपासणी केंद्रावर वाहनांची तपासणी मोफत होणार आहे. या सुविधेचा जास्तीत जास्त वाहन चालकांनी लाभ घ्यावा असं आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले आहे. सध्या शिर्डी व नागपूर या दोन ठिकाणी टायर तपासणी केंद्रांची उभारणी करण्यात आली आहे.
समृद्धी महामार्गाचा पहिला टप्पा शिर्डी ते नागपूर आणि दुसरा टप्पा शिर्डी ते भरवीर असा सुरु करण्यात आला आहे. या महामार्गावरील अपघात रोखण्यासाठी वाहनांच्या टायर तपासणी केंद्रांची उभारणी करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. टायर तपासणी केंद्रावर नायट्रोजन भरणे, बेसिक एअर फिलिंग, टायर वेअर तपासणी, वॉल्व तपासणी, वॉल्व पीन चेक आणि रिप्लेसमेंट, बेसिक पंक्चर दुरुस्ती, टायर वेअर चेक इत्यादी तपासण्या करण्यात येणार आहेत. विशेष म्हणजे ह्या सगळ्या तपासण्या मोफत करण्यात येणार आहेत.