राज्यात सध्या हनुमान चालिसावरुन राजकारणात कलगीतुरा रंगू लागला आहे. राणा दांपत्याने मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंच्या ‘मातोश्री’ निवासस्थानाबाहेर हनुमान चालिसा म्हणण्याचा इशारा दिल्यानंतर शिवसैनिक आक्रमक झाले होते.यानंतर पोलिसांनी राणा दांपत्याला अटक केली.दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांनी पुण्यात प्रसारमाध्यमांशी बोलताना यावर स्पष्ट प्रतिक्रिया दिली.
“एखाद्या धर्मासंबंधी, धर्माच्या विचारासंबंधी प्रत्येक व्यक्तीला त्याच्या काही भावना असतात. पण त्या भावना त्यांनी अंतःकरणात, घरात ठेवाव्यात. पण आपण त्याचं प्रदर्शन करु लागलो. त्याच्या आधारे अन्य घटकांसंबंधी एक प्रकारचा द्वेष वाढेल असे प्रयत्न केले तर त्याचे दुष्परिणाम समाजाला दिसू लागतात. महाराष्ट्रात असं कधी होत नव्हतं. अलीकडच्या काळात महाराष्ट्रात अशा वैयक्तिक अशा गोष्टी होत असून मला त्याचं आश्चर्य वाटतं,” असं शरद पवार म्हणाले.
राणा दाम्पत्य यांना १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. सरकारी पक्षाच्यावतीनं अॅड. प्रदीप घरत यांनी पोलीस कोठडीची मागणी केली होती. नवनीत राणा यांच्या विरोधात राजद्रोहाचं कलम १२४ अ अंतर्गत लावण्यात आलं असल्याची माहिती त्यांनी दिली. राणा दाम्पत्याच्या जामीन अर्जावर २७ फेब्रुवारी रोजी आम्ही लेखी बाजू मांडणार आहोत. असंही ते यावेळी म्हणाले. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि सरकार विरोधात वक्तव्य केल्याप्रकरणी देशद्रोहाचं कलम लावण्यात आलं आहे.किरीट सोमय्यांवर झालेल्या हल्यानंतर दिल्लीपर्यंत हे प्रकरण पोहोचलं आहे.