मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या अयोध्या दौऱ्यावर भाजप खासदार बृजभूषण सिंह आक्रमक झाले आहेत. राज ठाकरेंनी उत्तर प्रदेशातील जनतेची माफी मागावी अशी मागणी त्यांनी केली होती. या मागणीवर ते ठाम आहे. ‘राज ठाकरे माफी मांगो’, ‘राज ठाकरे चूहा है’ अशा घोषणा यावेळी राज ठाकरेंविरोधात देण्यात आल्या.
उत्तर प्रदेशच्या नवाबगंजमध्ये राज ठाकरेंच्या विरोधात मोर्चा काढण्यात आला. बरेलीतील नवाबगंजमध्ये राज ठाकरेंविरोधीत काढण्यात आलेल्या मोर्चामध्ये मोठ्या संख्येनं कार्यकर्ते सामील झाले होते.राज ठाकरेंच्या अयोध्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर आज एक बैठक पार पडणार आहे. खासदार बृजभूषण सिंह यांनी कार्यकर्ते आणि साधू, महंतांसोबत बैठकीचं आयोजन केलंय. या बैठकीत राज ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर महत्त्वपूर्ण चर्चा होणार आहे. राज ठाकरेंनी माफी मागितली नाही, तर त्यांना अयोध्येत पायही ठेवू देणार नाही, अशी आक्रमक भूमिका बृजभूषण सिंह आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी घेतली आहे. आता राज ठाकरे यांच्याविरोधात उत्तर भारतीयांनी जोरदार घोषणाबाजी अयोध्येत केली.दरम्यान,राज ठाकरेंविरोधात आणि त्यांच्या कृत्यांविषयी मी आधीपासून बोलतोय आणि त्यांची निंदा करतोय, असं बृजभूषण सिंह यांनी म्हटलंय.