मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते अजित पवार (Ajit Pawar) यांनी पक्षात बंड करून विधानसभा विरोधी पक्षनेते पदाचा राजीनामा देत उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेतल्यामुळे राज्याच्या राजकारणात मोठी खळबळ उडाली आहे. अजित पवार सरकारमध्ये सहभागी झाल्याने पुन्हा एकदा सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. एकीकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळ्या चर्चांना उधाण आलेलं असताना दुसरीकडे सर्वसामान्य जनता या राजकारण्यांवर टीका करताना दिसत आहे. ही जनता महाराष्टाच्या हितासाठी पुन्हा एकदा ठाकरे बंधूंनी एकत्र येण्याचं आवाहन करताना दिसत आहे.
शिवसेना भवनासमोर पोस्टर लावत राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांनी एकत्र येण्यासाठी आवाहन करण्यात आलं आहे. आता तरी एकत्र या अशी आर्त हाक या पोस्टरमधून (Poster) देण्यात आली आहे. महाराष्ट्रातील राजकीय भूकंपानंतर मनसे कार्यकर्त्याने शिवसेना भवन परिसरात हे बॅनर (Poster) लावले आहेत. मनसैनिक लक्ष्मण पाटील यांनी हे बॅनर लावले असून, राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंनी एकत्र यावे अशी साद घालण्यात आली आहे. या बॅनरवर बाळासाहेब ठाकरे यांच्यासह राज ठाकरे आणि उद्धव ठाकरे यांचा फोटो लावण्यात आला आहे.
काय लिहिले आहे बॅनरवर ?
“महाराष्ट्राच्या राजकरणाचा चिखल झाला, राजसाहेब – उद्धवसाहेब आता तरी एकत्र या. संपूर्ण महाराष्ट्र वाट पाहत आहे. एका महाराष्ट्रसैनिकाची हात जोडून कळकळीची विनंती,” असं लक्ष्मण पाटील यांनी या बॅनरवर लिहिलं आहे. आता या पोस्टरवर राज ठाकरे किंवा उद्धव ठाकरे काही प्रतिसाद देतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.