नाशिक : शिवप्रतिष्ठानचे प्रमुख संभाजी भिडे (Sambhaji Bhide) यांनी राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केल्यामुळे राज्यात मोठ्या प्रमाणात वाद निर्माण झाला आहे. भिडे यांनी (Sambhaji Bhide) महात्मा गांधींबद्दल केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा वेगवेगळ्या स्तरातून निषेध व्यक्त केला जात आहे. विरोधकांनी त्यांच्यावर कारवाई करण्याची मागणी उचलून धरली आहे. या सगळ्या प्रकरणावर राष्ट्रवादीचे जेष्ठ नेते छगन भुजबळ यांनी आपले मत व्यक्त केलं आहे.
काय म्हणाले छगन भुजबळ ?
“संभाजी भिडे, खरं म्हणजे तो मनोभर भिडे याच्यावर आम्हीसुद्धा एक केस दाखल केली आहे. आमच्या बंगल्यातील आंबे खाल्ल्यानंतर मुलगा होईल या वक्तव्यावर कोर्टात ती केस सुरू आहे. महात्मा फुले यांच्यावर ते टीका करतात पण महात्मा गांधी यांच्यावर देखील ते अत्यंत गलिच्छ पद्धतीने ते टीका करतात, मला खात्री आहे, पंतप्रधान मोदी किंवा अमित शाह कुणालाही हे आवडणार नाही.
“महात्मा गांधींना अख्खं जग नमन करतं. मी अनेक ठिकाणी गेलो, असं क्वचित देश असेल जेथे महात्मा गांधींचा पुतळा नाही. त्यांच्यावर गलिच्छ स्वरूपात टीका करतात त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे” असे भुजबळ म्हणाले. “त्यांच्यासोबत जाणं राजकारणासाठी आत्मघातकी आहे, महात्मा गांधींना असं बोललं तर देशातीलच तर नाहीच, गुजरातमधील कुठलाही बांधव-भगिनी सहन करेल का मग ते मोदी असतील किंवा शाह असतील…” असे छगन भुजबळ म्हणाले आहेत.
संभाजी भिडे यांच्यावर (Sambhaji Bhide) कठोर कारवाई का होत नाही? असे विचारले असता भुजबळ म्हणाले की, “कारवाई झाली पाहीजे, आम्ही कोर्टात गेलो, पण कोर्टात तारीखच लागत नाही. शेवटी सरकार केस करणार, पण केस केल्यानंतर ती लवकर वर आली पाहिजे. तारखांवर तारखा पडतात. आम्ही स्वतः कोर्टात गेलो आहोत. मला कधी-कधी वाटतं की मनोहर भिडे यांचं डोक ठिकाण्यावर आहे की नाही, तेच मला कळत नाही” असेही छगन भुजबळ यावेळी म्हणाले.