पुणे : सध्या राज्यात पावसाने (Monsoon Update) मोठ्या प्रमाणात धुमाकूळ घातला आहे. राज्यातील बहुतांश ठिकाणचे नदी- नाले तुडुंब भरून वाहताना दिसत आहेत. या पावसामुळे काही ठिकाणी पूर आला आहे. गावच्या गावे उध्वस्त झाली (Monsoon Update) आहेत. अनेकांच्या घरात पुराचं पाणी शिरल्यामुळे त्यांचा संपूर्ण संसार वाहून गेला आहे. यामुळे लाखो हेक्टर जमीन पाण्याखाली आल्यानं बळीराजावर दुबार पेरणीचं संकट ओढावलं आहे. यातच आता नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी समोर आली आहे. पुणे वेधशाळेनं वर्तवलेल्या अंदाजानुसार आजपासून पुढील काही दिवस पाऊस उघडीप देण्याची शक्यता आहे.
सरासरीपेक्षा 17 टक्के अधिक पाऊस
राज्यात गेल्या काही दिवसांपासून संततधार पाऊस सुरू आहे. या पावसाचा सर्वाधिक फटका हा कोकण आणि विदर्भाला बसला आहे. राज्यात आतापर्यंत सरासरीच्या 17 टक्के अधिक पाऊस झाला आहे. कोकण, गोव्यात सरासरीच्या 36 टक्के अधिक पाऊस झाला आहे, तर मराठवाडा आणि विदर्भात सरासरीच्या 15 टक्के जास्त पाऊस झाला आहे. तर अहमदनगर, सांगली, सातारा, जालना, अमरावती या जिल्ह्यांमध्ये अद्याप पाहिजे तेवढा पाऊस अजून झालेला नाही.
काय आहे हवामानाचा अंदाज?
हवामान विभागाने (Monsoon Update) दिलेल्या माहितीनुसार, आज राज्यातील कोणत्याही जिल्ह्याला पावसाचा रेड किंवा ऑरेंज अलर्ट देण्यात आलेला नाही. मात्र काही जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे. ठाणे, पुणे, मुंबई, पालघर, रत्नागिरी, रायगड, सातारा, कोल्हापूर आणि सिंधुदूर्ग या जिल्ह्यांना येलो अलर्ट देण्यात आला आहे.