मुंबई : सर्वोच्च न्यायालयाने व्यापाऱ्यांना 2 महिन्यात दुकानांवर मराठी पाट्या लावण्याचे आदेश ( Marathi Shop Signboards) दिले आहेत. प्रकरण उच्च न्यायालयामध्ये गेलं तर भुर्दंड भरावा लागेल असेदेखील कोर्टाने स्पष्ट केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयाचे मनसेकडून स्वागत करण्यात आले आहे. कोर्टाने दिलेल्या या निर्णयावर आता मनसे अध्यक्ष राज ठाकरेंनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.
काय म्हणाले राज ठाकरे?
“पुढील 2 महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापनांवर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सर्वोच्च न्यायालयाने दिला. त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार! ‘मराठी पाट्या’ या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष जो संघर्ष केला त्याला आजच्या निर्णयाने एक मान्यताच मिळाली,” असे राज ठाकरे म्हणाले. तसेच त्यांनी याबद्दल मराठी पाट्यांसाठी आंदोलन करणाऱ्या मनसैनिकांचं अभिनंदनसुद्धा केले आहे.
सस्नेह जय महाराष्ट्र
पुढील २ महिन्यांत महाराष्ट्रातील दुकानं, आस्थापन ह्यांच्यावर मराठी पाट्या लागल्याचं पाहिजेत असा स्पष्ट निकाल सुप्रीम कोर्टाने दिला, त्याबद्दल सर्वोच्च न्यायालयाचे मनापासून आभार. 'मराठी पाट्या' ह्या मुद्द्यासाठी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने गेली कित्येक वर्ष…— Raj Thackeray (@RajThackeray) September 26, 2023
मराठी भाषा मंत्र्यांनी केलं निर्णयाचं स्वागत
मराठी भाषा मंत्री आणि राज्याचे शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सर्वोच्च न्यायालयाच्या या निर्णयाचं स्वागत केलं आहे. “मराठी पाट्यांसंदर्भात सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या आदेशाचे स्वागत करतो. मराठी पाट्यांसंदर्भात शासन सातत्याने प्रयत्नशील असते मात्र काही व्यापारी याला विरोध करत न्यायालयात जातात. आता न्यायालयानेच यांना चपराक दिलेली आहे. हे मराठी भाषिक राज्य आहे इथे दुकानांवर मराठी भाषेत पाट्या पाहिजेत,” असं केसरकर म्हणालेत.