नाशिक : काही दिवसांपूर्वी नाशिक (Nashik) मधील त्र्यंबकेश्वर मंदिरात (Trimbakeshwar Temple) घडलेल्या प्रकाराबाबत मनसे अध्यक्ष राज ठाकरे (MNS President Raj Thackeray) यांनी आपले मत मांडले आहे. त्र्यंबकेश्वर मंदिराच्या पायरीवर संदलचा धूप फिरवण्याची परंपरा वर्षानुवर्षे सुरु असेल तर ती थांबवण्यात अर्थ नाही. महाराष्ट्रात अनेक ठिकाणी हिंदू-मुसलमानांमध्ये अशाप्रकारे सख्याच्या गोष्टी सुरु आहेत.
या गोष्टी सुरुच राहिल्या पाहिजेत. इतर धर्माचा माणूस आपल्या मंदिरात आला म्हणून हिंदू धर्म भ्रष्ट होईल, इतका तो काही कमकुवत आहे का, असा परखड सवाल विचारत मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणावरुन रान उठवणाऱ्यांना फटकारले आहे. अशा परंपरा या सुरु ठेवल्या पाहिजेत. पण त्र्यंबकेश्वर मंदिरात घडलेल्या प्रकाराकडे चुकीच्या नजरेने पाहणाऱ्यांची वृत्ती कोती आहे.
त्र्यंबकेश्वर मंदिराबाबतचा निर्णय स्थानिक ग्रामस्थांनी घ्यावा. बाहेरच्या लोकांनी त्यामध्ये पडू नये, अशा स्पष्ट शब्दांत राज ठाकरे यांनी त्र्यंबकेश्वर प्रकरणावरुन रान उठवणाऱ्यांना सुनावले आहे.