मुंबई: गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांसाठी (Mhada) मोठी दिलासादायक बातमी समोर आली आहे. यापूर्वी झालेल्या सोडतीमध्ये यशस्वी न झालेल्या एकूण 1 लाख 50 हजार 484 गिरणी कामगार आणि त्यांच्या वारसांची पात्रता निश्चिती लवकरच पूर्ण होणार आहे. यासाठी म्हाडाकडून कालबद्ध विशेष अभियानाचे आयोजन करण्यात आले आहे. 14 सप्टेंबर 2023 पासून वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयात करण्यात येणार आहे. राज्यातील गिरणी कामगार/ वारसांना पात्रता निश्चितीकरिता कागदपत्रे सादर करण्यासाठी ऑनलाईन सुविधा देखील मंडळातर्फे उपलब्ध करून देण्यात आली आहे.
यासंदर्भात 21 ऑगस्ट 2023 रोजी बैठक पार पडली होती. राज्याच्या एकंदरीत जडणघडणीत महत्वाचा भाग असलेल्या गिरणी कामगार/त्यांच्या वारसांना हक्काचे घर मिळवून देऊन जीवनमानाचा दर्जा उंचावणेकरिता शासन कटिबद्ध असल्याने मंडळाकडे प्राप्त अर्जांची पात्रता लवकरात लवकर निश्चित करण्यात यावी, असे यावेळी सांगण्यात आले होते. या निर्देशानुसार गिरणी कामगार पात्रता निश्चितीचे विशेष अभियान वांद्रे पूर्व येथील म्हाडा मुख्यालयातील पहिला मजला, कक्ष क्रमांक 240, पणन कक्ष या ठिकाणी आयोजित करण्यात आले आहे.
तसेच गिरणी कामगार/ वारसांनी म्हाडा मुख्यालयात येऊन प्रत्यक्ष कागदपत्रे सादर करण्याव्यतिरिक्त, मंडळातर्फे तयार करण्यात आलेले म्हाडाचे अधिकृत वेबसाईट www.millworkereligibility.mhada.gov.com वर कागदपत्रे अपलोड करण्याची सुविधा देखील उपलब्ध करण्यात आली आहे. या विशेष मोहिमेदरम्यान जमा झालेली कागदपत्रे कामगार विभागाच्या अधिकाऱ्यांकडे गिरणी कामगार/ वारसांच्या पात्रतेकरिता पाठविण्यात येणार आहेत व यामुळे गिरणी कामगार/ वारसांची पात्रता लवकरात लवकर निश्चित होणार आहे.
मंडळातर्फे करण्यात आले ‘हे’ आवाहन
पात्रता निश्चितीकरिता मंडळाने विहित केलेल्या 13 पैकी कोणत्याही कागदपत्रांची स्वसाक्षांकीत छायांकित प्रत सादर करावी. यामध्ये गिरणी कामगारांचे ओळख पत्र , तिकीट नंबरची प्रत, सर्व्हिस प्रमाणपत्र, लाल पास, प्रॉव्हिडंट फंड क्रमांक, इ एस आय सी क्रमांक, मिल प्रमाणपत्र प्रत, हजेरी पत्र , लीव्ह रजिस्टर प्रत, उपदान प्रदान आदेश , भविष्य निर्वाह निधी सेटलमेंट आदेशाची प्रत, पगार पावती यापैकी उपलब्ध कागदपत्र सादर करावीत. तसेच आधार कार्ड सादर करणे बंधनकारक आहे. सदरील अभियान कालबद्ध असल्याने अधिकाधिक गिरणी कामगार व वारसांनी या विशेष अभियानात सहभागी होऊन शासनास सहकार्य करावे, असे मंडळातर्फे आवाहन करण्यात आले आहे.