महाराष्ट्र : काही काळ विश्रांती घेतलेल्या पावसाने पुन्हा एकदा पडायला सुरुवात केली आहे. राज्यातील काही भागात दोन दिवसांपासून मुसळधार पावसाने हजेरी लावली. दरम्यान पुढील पाच दिवस मॉन्सून सक्रिय राहणार आहे.
कोकण, मध्य महाराष्ट्रासह, विदर्भ, मराठवाड्यात पावसाने काही जिल्ह्यात पावसाच्या सरी बरसल्या. आता पुढील 5 दिवस राज्यातील कोल्हापूर, सातारा, पुणे, सिंधुदुर्ग, रत्नागिरी, रायगड, पालघर, मुंबई, नाशिक, ठाणे, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया या भागांत 9 ऑगस्टपर्यंत हवामान विभागाने ‘ऑरेंज अलर्ट’ जारी केला आहे.
तर मराठवाड्यातही मध्यम स्वरुपाच्या पावसाचा अंदाज भारतीय हवामान विभागाने दिला आहे. पुढील 5 दिवस राज्यात मान्सून सक्रिय राहणार असून त्यातही हळूहळू वाढ होईल, असा अंदाज भारतीय हवामान विभागाने वर्तवला आहे.राज्यातील जिल्हास्तरीय इशाऱ्यांबरोबरच मच्छिमारांसाठी खोल समुद्रात जाऊ नये, असं आवाहन करण्यात आलं आहे.
बंगालच्या उपसागरातील मध्य पूर्व आणि उत्तर पश्चिम भागात आज कमी दाबाचा पट्टा तयार होणार आहे. यामुळे पावसाचा जोर आणखी वाढणार आहे.कमी दाबाचा पट्टा तयार होणार असल्याने या भागाकडून राज्याकडे बाष्प वाहू लागले आहे. त्यामुळे कोकण, मध्य महाराष्ट्र आणि विदर्भाच्या काही जिल्ह्यांत अतिमुसळधार पाऊस बरसणार आहे. तर उर्वरित भागातही मुसळधार पाऊस पडणार असल्याचा अंदाज हवामान विभागाने वर्तवला आहे.