मुंबई : राज्यात मराठा आरक्षणाचा (Maratha Reservation) प्रश्न चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला 40 दिवसांचा वेळ दिला होता. मात्र 40 दिवस देऊनदेखील मराठा आरक्षण न मिळाल्याने जरांगे पाटील पुन्हा एकदा उपोषणाला बसले आहेत. आज त्यांच्या उपोषणाचा नववा दिवस आहे. एकीकडे शांततेत हे आंदोलन सुरु असताना काही ठिकाणी मराठा आरक्षण आंदोलनाला हिंसक वळण लागल्याचे पाहायला मिळत आहे.
दरम्यान आज सरकारचे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांची भेट घेणार आहे. ओबीसी व गृहनिर्माण मंत्री अतुल सावे, फलोत्पादन मंत्री संदीपान भुमरे, आमदार नारायण कुचे यांचा या शिष्टमंडळात समावेश आहे. जरांगे पाटील यांना शिष्टमंडळाच्या वतीनं सर्वपक्षीय नेत्यांच्या ठरावाची प्रत देण्यात येणार आहे. तसेच आरक्षणासाठी सरकारला थोडा वेळ देण्यात यावा त्यासाठी उपोषण मागे घ्यावं, अशी विनंतीही हे शिष्टमंडळ मनोज जरांगे पाटील यांना करणार आहे.
यामुळे सरकारचे शिष्टमंडळ आणि मनोज जरांगे पाटील यांच्यात काय चर्चा होते. सरकारचे शिष्टमंडळ जरांगे पाटलांच्या मागण्या मान्य करतात का?, मनोज जरांगे आपले आंदोलन मागे घेणार का? हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे. सध्या पार्श्वभूमीवर ही भेट खूप महत्वाची असणार आहे.